मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं
sanjay shirsat news : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात पुढील काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची बैठक दिल्लीत होणार असल्याचाही दावा एका मंत्र्याने केला होता. तर आमदार रवी राणा यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे देशातील कामकाज पाहतील. तर सुनेत्रा पवार राज्यात लक्ष घालतील, असाही दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेचा जोर वाढलाय. याचदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचा दावा एका बड्या नेत्याने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशासहित राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल फुटीर खासदारांना विलिनीकरणासाठी मंजुरी दिली. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणही बदलून गेलं आहे. याच राज्यातील राजकीय घडामोडीवर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर मंत्री शिरसाट म्हणाले, ‘ आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात, ज्या काही अटी-शर्थी आहेत. त्या दोघांनाही मान्य नाहीत. ते वेगवेगळे जर विलीन झाले तर होऊ शकतात, मात्र एकत्रितपणे विलीन होणार नाहीत’.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ‘घाटी रुग्णालय हे मराठवाड्याचे केंद्र ज्या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून पेशंट येतात. सुविधा देण्यासाठी शासनाचा सर्व प्रयत्न असतो. गेल्या वर्षी मी स्वतःच ‘डीपीटीसी’मधून त्यांना जवळपास 55 ते 60 कोटी दिले. गोरगरीब जनतेतून इथे येणारा रुग्ण आहे. इतका गरीब असतो की, त्याच्याकडे खायला सुद्धा नसते. त्यामुले आपण सर्व सुविधा देत असतो. परंतु ज्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तक्रारी गंभीर स्वरूपाचे आहेत. त्या कामाची अवस्था स्वतः पाहिले 14 कोटी रुपये खर्चून काहीच इनपुट दिसत नाही.
‘आताच मी इंजीनिअरना सांगितलं की, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. एका शिक्षणाचा विलंब न लावता त्याच्यावर कारवाई करा. काय गुन्हे दाखल करता येतात, ते करा. येणाऱ्या डीपीडीसीमध्ये सुद्धा मी यात गांभीर्याने चर्चा करणार आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्याकडे सुद्धा हा विषय काढणार आहे. या घाटीसाठी आपण जे योगदान देतोय, त्याचा जर कोणी गैरफायदा उचलत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ठाकरेंच्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, ‘ते शिवसेनेचे होते, शिवसेनेत आले. त्यांनी पक्ष बदलला नाही. पक्षाचे चिन्ह तेच आहे, पक्षाचे धोरण तेच आहे. त्यामुळे पक्ष बदलायची कारवाई त्यांच्यावर होणार नव्हती, हा विश्वास आम्हाला ठाम होता’. रामरक्षा आंदोलनावर शिरसाट म्हणाले, ‘ काल उद्धव ठाकरेंनी ज्या गोष्टी जाऊन केल्या, त्याला लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला नाही. जेव्हा सगळं पाणी पुलाखालून वाहून गेल्यानंतर धोपटणं ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम घेतला. एकनाथ शिंदेंनी त्यांना सांगितलं की, पक्षाची रक्षा पहिले करा. पक्षाच्या कार्यकर्त्याला जपा पण त्यांच्याकडून हे होणे शक्य नाही म्हणून त्यांच्या पक्षाची ही हालत आहे.’
