बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्यास कोण होणार मुख्यमंत्री? अमित शाहांनी केलं स्पष्ट

| Updated on: Oct 18, 2020 | 2:04 PM

बिहारमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा आल्या तरी मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच राहतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्यास कोण होणार मुख्यमंत्री? अमित शाहांनी केलं स्पष्ट
Follow us on

नवी दिल्ली: बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही अर्थात NDA आघाडीचा विजय झाला आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच असतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलंय. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी ही माहिती दिली आहे. तसंच पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला पुरेश्या जागा देण्याची तयारी दाखवली होती. पण त्यांनी NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचं मतही शाहांनी व्यक्त केलं. (Nitish Kumar will be the Chief Minister of Bihar, clear from Amit Shah)

बिहारमध्ये NDA नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढेल अशी घोषणा भाजपने यापूर्वीच केली होती. या घोषणेत आता बदल होणार नसल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बिहारमध्ये NDAचा विजय झाला आणि भाजपला जनता दल (संयुक्त) पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, असं शाह म्हणाले.

चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी आपले उमेदवार JDU उमेदवारांच्या विरोधात उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळं JDUच्या जागा कमी होऊन, भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. पण अमित शाह यांनी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केल्यानं JDU नेत्यांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत होईल.

बिहारमधील NDAचं जागावाटपाचं गणित

बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) 122 तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला JDUच्या कोट्यातून सात जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या कोट्यातून मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीला 11 जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळं NDA कडून JDU 115, भाजप 111, हिंदुस्तानी अवाम मोर्चा ७ तर विकासशील इन्सान पार्टी 11 जागा लढवत आहेत.

भाजपकडून चिराग पासवान यांचा वापर- तारिक अन्वर

बिहारमध्ये नितीश कुमार यांना रोखण्यासाठी भाजपकडून लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी केलाय.

संबंधित बातम्या:

‘बिहारच्या निवडणुकीत स्थलांतरित मजूर मतपेटीतून भाजपविरोधात रोष व्यक्त करतील’

‘सुशांतला न्याय द्या’, बिहारच्या सभेत घोषणाबाजी; फडणवीसांनी जोडले हात

Nitish Kumar will be the Chief Minister of Bihar, clear from Amit Shah