‘सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे’, फडणवीसांचा इशारा कुणाकडे?

| Updated on: Mar 14, 2021 | 4:03 PM

पोलिसांतील लोकच असं काम करत असतील, अशा गंभीर गुन्ह्यात त्यांचाच सहभाग असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? असा सवाल फडणवीसांनी राज्य सरकारला विचारलाय.

सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे, फडणवीसांचा इशारा कुणाकडे?
Devendra Fadnavis_Sachin Vaze
Follow us on

पुणे : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी NIAने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. ‘हे संपूर्ण प्रकरणत अत्यंत गंभीर आहे. पोलिसांतील लोकच असं काम करत असतील, अशा गंभीर गुन्ह्यात त्यांचाच सहभाग असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? असा सवाल फडणवीसांनी राज्य सरकारला विचारलाय.(Devendra Fadnavis has serious allegations against the Thackeray government over the Sachin Waze case)

NIA ने केलेल्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा अद्याप एकच भाग समोर आला आहे. यातील दुसरा भाग महत्वाचा आहे. मनसुख हिरे हत्या प्रकरण गंभीर आहे. त्या हत्या प्रकरणाचा खुलासाही बाकी आहे. याबाबतही लवकरच कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

‘..म्हणून सचिन वाझेंना बळ मिळालं’

सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबीत होते. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू करुन घेण्याचा आग्रह होता. त्याबाबत आपण अॅडव्होकेट जनरल यांच्याची चर्चा केली. पण त्यांना पुन्हा कामावर घेणं योग्य नव्हतं. आता कोरोनाचं कारण देत ठाकरे सरकारनं त्यांना फक्त कामावरच घेतलं नाही तर क्राईम ब्रांचमध्ये घेतलं. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडे जाईल अशी व्यवस्थाही केली. मग सरकारने दाखवलेला या विश्वासाच्या जोरावर आपण काहीही करु शकत, असं वाझेंना वाटत होतं. सचिन वाझेंवर सरकारचा एवढा विश्वास का होता? त्यातूनच त्यांना गंभीर गुन्हे करण्याचं बळ मिळालं, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

राऊतांकडून कौतुक, फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण विधानसभेत मांडलं, त्याचं कौतुक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, फडणवीस यांनी आपण फक्त आपलं काम केल्याचं म्हटलंय. मी माझं काम केलं. मला मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर त्या योग्य ठिकाणी मांडण्याचं काम आपण केल्याचं फडणवीस म्हणाले.

‘राज्य अस्थिर करण्याचा आरोप हास्यास्पद’

दरम्यान, या प्रकरणात विरोधक राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सरकारमधील मंत्री करत आहेत. त्याबाबत हा आरोप हास्यास्पद आहे. एक पोलीस अधिकारी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असील आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम सरकार करत असेल तर हे किती योग्य आहे? सचिन वाझेंना पुन्हा कामावर का घेण्यात आलं? त्यांना एवढं मोठं पद का देण्यात आलं? असा सवालही फडणवीसांनी राज्य सरकारला विचारलाय.

संबंधित बातम्या :

सचिन वाझेंच्या अटकेनंतर सत्ताधारी-विरोधक आक्रमक; वाचा, कोण काय काय म्हणाले?

फडणवीसांची स्तुती, पोलिसांवर ‘बाह्यशक्तीं’चं नियंत्रण आणि अंबानींच्या हेलिपॅडसाठी कट…? संजय राऊत यांचं स्फोटक ‘रोखठोक’!

Devendra Fadnavis has serious allegations against the Thackeray government over the Sachin Waze case