सोनियांसमोर ममता म्हणाल्या, उद्धवजी अच्छी फाईट कर रहे हो, उद्धव म्हणाले, लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूँ

| Updated on: Aug 26, 2020 | 11:25 PM

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.

सोनियांसमोर ममता म्हणाल्या, उद्धवजी अच्छी फाईट कर रहे हो, उद्धव म्हणाले, लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूँ
Follow us on

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळे आधी बोलू द्या, अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केली. उद्धव यांनी प्रांजळपणे ममतादीदींना परवानगी मागितली असता, “उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली. तेव्हा उद्धव ठाकरे “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं” असे अभिमानाने म्हणाले. (Opposition Party Chief Ministers meeting Uddhav Thackeray Mamta Banerjee with Sonia Gandhi)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे चार, तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांना कॅबिनेटची बैठक घ्यायची होती, त्यामुळे सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना सांगितलं की आधी उद्धव यांना बोलू द्या. त्यावर उद्धव ठाकरे ममता दीदींना म्हणाले ‘इजाजत है क्या दीदी?’ त्यावर ममता यांनी “उद्धवजी, आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशा शब्दात  त्यांचे कौतुक केले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं” असे अभिमानाने सांगितले.


“केंद्र सरकारशी लढायचे की घाबरुन बसायचे, हे आपण ठरवायला हवे” असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मांडले. “संकट आलं की आपण एकत्रित येतो. पण आपल्याला एकत्रित यायला संकटाची गरज कशाला आहे? आपण एरवीसुद्धा भेटत राहिले पाहिजे, ज्यामुळे संकटच घाबरुन म्हणेल की हे लोक एकत्र आहेत” असंही ते म्हणाले.

“जीएसटी येणार नाही तर आम्ही काय करणार? एक-एक गोष्ट केंद्र सरकार बंद करत आहे. आम्ही काय केंद्राला भीक मागत नाही. जनतेने सर्वांना निवडून दिलं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं. संकटाच्या काळात आधी एकत्र यायला हवं. आपण एकत्र असलो की संकटाची काय बिशाद आहे?” असा मुद्दाही त्यांनी मांडला. (Opposition Party Chief Ministers meeting Uddhav Thackeray Mamta Banerjee with Sonia Gandhi)

आदित्य ठाकरे यांनी उचललेल्या दोन मुद्द्यांचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केला. शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असं करायला काय हरकत आहे? आणि पर्यावरणाची हानी करुन मेळघाटातून रेल्वे नेण्याचा घाट कशाला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

“आम्ही विकास करण्यासाठीच सरकारमध्ये आलेलो आहोत, लॉकडाऊन लावण्यासाठी सरकारमध्ये आलो नाही. पण काही गोष्टींचा तारतम्याने विचार करणे गरजेचे आहे. मध्यंतरी मी बातमी वाचली, अमेरिकेत शाळा सुरु केल्यामुळे 97 हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली.” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.