Pm Modi Amit Shah Meet : दिल्लीत मोदी-शाह यांची अडीच तास खलबतं, महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा?

| Updated on: Jun 23, 2022 | 11:44 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात अडीच तासांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच सरकार स्थापन करताना येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार झाल्याचीही शक्यता आहे.

Pm Modi Amit Shah Meet : दिल्लीत मोदी-शाह यांची अडीच तास खलबतं, महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा?
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याचं राजकारण हे सध्या एखाद्या घाटातल्या वळणापेक्षाही जास्त वळणं घेत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीतल्या हॉटेलमधून ट्विटवर ट्विट करत आहेत. त्यांना आत्ताच ट्विट कर आम्ही शिवसेना म्हणत पुन्हा शिवसेनेला (Shivsena) चॅलेंज केलं आहे. अशातच आता दिल्लीच्या राजकारणातही अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi Amit Shah Meeting) आणि अमित शहा यांच्यात अडीच तासांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच सरकार स्थापन करताना येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार झाल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आत्ता दिल्लीतून काही सुत्रं फिरणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

फडणवीसही बैठकीत असण्याची शक्यता

या बैठकीला फक्त पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण गेल्या दोन दिवसात फडणवीसांचा दुसरा दिल्ली दौरा आहे. फडणवीस जर या बैठकीला उपस्थित राहिले असतील तर नक्कीच महाराष्ट्रातील घडामोडींवरच चर्चा झाली असणार. तसेच भाजपची पुढची रणनितीही ठरली असणार, असा अंदाज आता राजकीय पंडितांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढचे काही तास हे राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत.

भाजप नेत्यांकडून अंदाज घेण्याचे काम सुरू

राज्यातली राजकीय परिस्थिती उद्धवण्याला भाजप नेतेच जबाबदार आहेत. भाजप नेत्यांनी हा कट रचलाय असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे या बंडाच्या पहिल्या दिवसांपासून करत आहेत. असाच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही केला आहे. पवारांनी तर बाहेरच्या राज्यातील नेत्यांची नावंही आजच्याच पत्रकार परिषदेत घेतली आहे. तर दुसरीकडे अनेक भाजप नेते हे या बंडोखोर आमदारांसोबत दिसून आले आहेत. बंडखोरीच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय संजय कुटे हे सुरतमध्ये दिसून आले. त्यानंतर आमदारांना गुवाहाटीला नेताना सोबत मोहित कंबोज आणि इतर नेतेही दिसून आले. त्यामुळे आता भाजपच्या गोटात शिजतंय काय? असा सवालही राज्याच्या राजकारणात बळावत आहे. येत्या काही तासात हाही सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.