आगामी निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला; काय आहे सेवा संकल्प अभियान? रविंद्र चव्हाणही मैदानात
आगामी निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला आहे. पोटनिवडणूक आणि आगामी निवडणुकीसाठी मास्टर प्लान आखला आहे. आता भाजपने सेवा संकल्प अभियान सुरू केलं आहे.

देशात उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या दोन्ही राज्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपसहित विरोधकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप आणि विरोधकांनी आतापासून मतदारांना जोडण्यासाठी प्लान आखण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे काही महिन्यांपासून काँग्रेसने ‘छात्र की गूंज’ हा कार्यक्रम हाती घेतलाय. या माध्यमातून सर्वसामान्य आणि जेन-झी मतदारांशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला. दुसरीकडे भाजपने सेवा संकल्प अभियान हाती घेतलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने सेवा संकल्प अभियान हाती घेतलं आहे. पंतप्रधान मोदींची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि 2047 पर्यंत विकसित भारत या संकल्पाशी जोडण्यासाठी सेवा संकल्प अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. या अभियानांतर्गत विविध शैक्षणिक आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबत सरकारी आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी महाविद्यालय , उच्च शिक्षण संस्थांमध्येही चित्रकला, भाषण आणि सामान्य ज्ञान स्पर्धा देखील आयोजित केल्या जाणार आहेत. हे अभियान महिनाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
भाजपचा 12 कलमी कार्यक्रम काय?
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत रक्तदान शिबीर, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, आभार प्रदर्शन, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी कामे पोहोचवण्यात येणार आहेत. या अभिायानांतर्गत एकूण बारा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
वसईतही अभियानाचे उद्घाटन
वसई-विरार शहर महानगरपालिकेत ‘सेवा संकल्प अभियान’ महापौर आजीव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदाला वाढदिवसाच्या दिवशी २५ वर्षे झालेत. त्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच त्यांना या सेवांचा लाभ मिळवून देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानामार्फत नागरिकांपर्यंत महापालिकेच्या सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डोंबिवलीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा धमाका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत डोंबिवलीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने आगामी राजकीय घडामोडींसाठी एक मोठा प्लान आखल्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मंदिरात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आणि भाजपच्या विकसित भारत संकल्पाची घरोघरी चर्चा घडवून आणण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे. यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले, आशीर्वादाचा दिवा पंतप्रधान मोदी यांच्या सेवाव्रताचे आणि विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. तुम्ही घरी किंवा परिसरात असाच दिवा प्रज्वलित करावा. तसेच लाडक्या पंतप्रधान मोदी यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन चव्हाणांनी केलं.