CM Nitish Kumar : महाराष्ट्र मिळवला, बिहार गमावणार? नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; काँग्रेस-राजद आणि जेडीयू युतीची शक्यता

CM Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे उद्या पाटणामध्ये आरजेडी आमदारांची बैठक होणार आहे. जेडीयू-भाजपची युती तुटण्याची शक्यता असल्याने आरजेडीच्या या बैठकीला अधिक महत्त्व आलं आहे.

CM Nitish Kumar : महाराष्ट्र मिळवला, बिहार गमावणार? नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; काँग्रेस-राजद आणि जेडीयू युतीची शक्यता
महाराष्ट्र मिळवला, बिहार गमावणार? नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; काँग्रेस-राजद आणि जेडीयू युतीची शक्यता
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2022 | 10:35 AM

पाटणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडानंतर भाजपला (bjp) महाराष्ट्रात आपलं सरकार आणता आलं आहे. मात्र, बिहारमधील सत्ता भाजपच्या हातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू युती तुटण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसात जेडीयूकडून युती तुटल्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जेडीयू लवकरच आरजेडी, डावे आणि काँग्रेसला सोबत घेऊन युती करण्याची शक्यता आहे. त्यासाठी जेडीयूची सर्व धडपड सुरू आहे. भाजपकडून पक्ष फोडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा जेडीयूकडून आरोप केला जात आहे. आरसीपी सिंह यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी दिली होती. सिंह यांच्या माध्यमातूनच भाजप जेडीयू फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जेडीयूने केला आहे. एवढेच नव्हे तर नितीश कुमार यांच्या जेडीयूतील आमदारांना मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच नितीशकुमार (nitish kumar) हे आरजेडी, लेफ्ट फ्रंड आणि काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शोधत असल्याचं सांगितलं जात आहे.

बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे उद्या पाटणामध्ये आरजेडी आमदारांची बैठक होणार आहे. जेडीयू-भाजपची युती तुटण्याची शक्यता असल्याने आरजेडीच्या या बैठकीला अधिक महत्त्व आलं आहे. आरजेडीच्या या बैठकीला सर्व खासदारही उपस्थित राहणार आहे. आज संध्याकाळपर्यंत हे खासदार आणि आमदार पाटणामध्ये दाखल होणार आहेत.

नितीशकुमार काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार हे काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. नीतीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. आरसीपी सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्ष अधिक सक्रिय झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून भाजप आणि नीतीश कुमार यांच्यात बेबनाव सुरू झाला आहे. त्यामुळे बिहारमधील एनडीएचं सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या एक महिन्यात चार वेळा भाजप आणि नितीश कुमार आमने सामने आले आहेत.

नितीश कुमारांकडून टाळाटाळ

  1. सर्वात आधी 17 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. नितीश कुमार या बैठकीत सहभागी झाले नव्हते.
  2. त्यानंतर 22 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं होतं. पण नितीश कुमार त्याही कार्यक्रमाला हजर राहिले नाही.
  3. 25 जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याचं नितीश कुमार यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. तरीही ते आले नाही.
  4. 7 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला नितीश कुमार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्याही बैठकीला नितीश कुमार हजर राहिले नाही.