‘ये तो सिर्फ झाकी है, शहर अभी बाकी है’, औरंगाबादेत नामकरणावरुन राजकारण तापलं

| Updated on: Mar 06, 2020 | 7:22 PM

शहरातील औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नामकरण करण्यात आलं. याच विषयावरुन औरंगाबाद शहरात आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

ये तो सिर्फ झाकी है, शहर अभी बाकी है, औरंगाबादेत नामकरणावरुन राजकारण तापलं
Follow us on

औरंगाबाद : शहरातील औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नामकरण करण्यात आलं. याच विषयावरुन औरंगाबाद शहरात आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे (Politics on Renaming of Aurangabad). शहराचं नाव बदलायचं सोडून विमानतळाचं नाव बदलून शिवसेना मुख्य विषयाला बगल देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. यावरुनच शिवसेना आणि विरोधीपक्ष यांच्यात जुंपली आहे.

गुरुवारी (5 मार्च) औरंगाबाद विमानतळचं नाव छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं करण्यात आलं. या नामकरणानंतर शिवसैनिकांनी विमानतळावर गर्दी करत मोठा जल्लोष केला. ‘ये तो सिर्फ झाकी है, शहर अभी बाकी है’, अशा घोषणा मोठ्या आवेशात देण्यात आल्या. मात्र, गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादच्या नागरिकांना शहराचं नाव कधी बदललं जाणार याची प्रतिक्षा आहे. मात्र शहराचं नामकरण दृष्टीक्षेपात असल्याचं सांगून शिवसेनेचे नेते नागरिकांचा अजूनही विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विमानतळाचं नाव बद्दलण्यानंतर शहराचं नावही लवकरच बदलू असं शिवसैनिक सांगत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही निव्वळ आश्वासनांची खैरात असल्याचा आरोप सध्या विरोधक करत आहेत. आश्वासन तर शहराचं नाव बदलण्याचं होतं. त्यामुळे शिवसेना शहराचं नाव बदलण्याऐवजी विमानतळाचं नाव बदलून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे का असा आरोप मनसेकडून केला जात आहे.

औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यात यावं अशी आग्रही मागणी भाजपही सातत्याने केली आहे. शहराचं नाव बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत महापौरांना स्मरणपत्र दिलं आहे. आतापर्यंत भाजपनं जवळपास 5 स्मरणपत्र दिली आहेत. आता विमानतळाचे नाव बदलल्यानंतर भाजपने या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र, शहराचं नाव कधी बदलणार असा सवालही उपस्थित केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विमानतळाचे नाव बदलल्यानंतर याचा फायदा शिवसेनेला निश्चित होणार आहे. यानंतर शिवसेना शहराचं नाव बदलण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढं टाकलंय असा दावाही करू शकते. मात्र, त्यामुळे शहराचं नाव बदलण्यासाठी विरोधकही शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.

Politics on Renaming of Aurangabad