बिहारमध्ये शिवसेनेशी युती नाही, राष्ट्रवादीचं ठरलं!

| Updated on: Oct 13, 2020 | 2:12 PM

बिहारमध्ये आम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं.

बिहारमध्ये शिवसेनेशी युती नाही, राष्ट्रवादीचं ठरलं!
Follow us on

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Vidhansabha Election) राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बिहारमध्ये स्वतंत्रपणे लढताना दिसतील. (Praful Patel clarifies NCP Shivsena wont make alliance for Bihar Vidhansabha Election)

बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. आम्ही काँग्रेस आणि राजदबरोबर चर्चा केली. आम्ही केवळ 4 ते 5 जागा मागितल्या, पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, राजद नेते तेजस्वी यादव यांच्याशी आम्ही चर्चा केली. बिहारमध्ये भाजप, जेडीयू यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, मात्र ते झालं नाही. त्यामुळे बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत, शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हदेखील दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेल्यानंतर बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

संजय राऊत काय म्हणाले?

बिहार निवडणुकीत कुणासोबत युती करायची याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होईल’ असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. (Praful Patel clarifies NCP Shivsena wont make alliance for Bihar Vidhansabha Election)

दरम्यान, मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपालांनी सूचवणे योग्य नाही, हे राज्य सरकारचे काम आहे, असं म्हणत प्रफुल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य केलं.

राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करायला हवं, राज्यपालांनी मर्यादा ओलांडू नये. कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्यासाठी राज्य सरकार योग्य ते निर्णय घेत आहे, असंही पटेल यांनी राज्यपालांना सांगितलं.

संबंधित बातम्या :

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार ? संजय राऊतांनी सांगितलं सत्य

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

(Praful Patel clarifies NCP Shivsena wont make alliance for Bihar Vidhansabha Election)