ना महाविकास आघाडी, ना महायुती, वंचित जिंकणार ४८ पैकी ४८ जागा, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला फॉर्मूला

Loksabha Election 2024 | मराठ्यांचे ताट वेगळं व्हावं यासाठी मनोज जरांगे लढत आहेत. त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. मनोज पाटील यांनी आंदोलन जर जिरवायचे नसेल तर त्यांना निवडणुकीत लढण्याशिवाय पर्याय नाही.

ना महाविकास आघाडी, ना महायुती, वंचित जिंकणार ४८ पैकी ४८ जागा, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला  फॉर्मूला
Jitendra Zavar | Updated on: Feb 28, 2024 | 7:44 AM

अभिजित पोते, पुणे | दि. 28 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. मार्च महिन्यात निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरु आहे. सर्व्हे केले जात आहेत. त्यातून महाविकास आघाडी की महायुती याचा दावा केला जात आहे. परंतु आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे. राज्यातील ४८ पैकी ४८ जागेवर वंचित आघाडीचे उमेदवार विजयी होणार आहे. त्यासाठी त्यांनी एक सूत्रही सांगितले आहे.

राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार येणार नाही याची दक्षता घ्या. राज्यात दंगली घडवण्याच्या प्रयत्न होणार आहे. नेत्यांना पळवायचे काम सुरू आहे. उद्या आघाडी होईल की नाही सांगता येत नाही. परंतु आघाडी व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. मतदार ठरवेल उद्या सत्तेवर कोण बसणार आहे.

असे गणित करा पक्के

राज्यात आपले उमेदवार निवडून येण्यासाठी गणित पक्के करा. काही झाले तरी हे गणित सोडू नका. फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या प्रत्येक मतदाराने ५ मतदार जोडले पाहिजे. ज्या दिवशी प्रत्येक जणाकडून हे काम होईल तेव्हा भाजपचे सरकार केंद्रात येणार नाही. ही पक्षाची नाही तर आपली स्वतःची निवडणूक असणार आहे. तुम्हाला वेगळी वेगळी करणे देऊन सुद्धा बंदिस्त केलं जाईल. बंदिस्त राहायचं आहे का याचा निर्णय लोकसभेत घ्यायचा आहे.

मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी

सध्या मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्यात येत आहे. वंचितने भूमिका घेतलीय की ओबीसीचे ताट वेगळं आणि मराठ्यांचे ताट वेगळं हवं. मराठ्यांचे ताट वेगळं व्हावं यासाठी मनोज जरांगे लढत आहेत. त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. मनोज पाटील यांनी आंदोलन जर जिरवायचे नसेल तर त्यांना निवडणुकीत लढण्याशिवाय पर्याय नाही.

हा फॉर्मूला सर्व जागा जिंकून देणार

सध्या मुस्लिम समाज सुद्धा स्वतःची सुरक्षा राजकीय पक्षात शोधतोय. मुस्लिम समाजाला सांगतोय की राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही. वंचित सभेत मुस्लिम समाजाला सुरक्षिताता मिळेल. ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण ४८ पैकी ४८ जागा जिंकू. मुस्लिम समाजाला आवाहन आहे जिथे जिथे वंचित उमेदवार उभा असेल त्याला निवडून द्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us