अधिकारी आणि फडणवीसांच्या भेटीबाबत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’, दरेकरांचा पलटवार

| Updated on: Sep 07, 2021 | 3:32 PM

नवाब मलिक यांचं फस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत आहे. जर आयएएस आणि आयपीएस अधिकारी देवेंद्र फडणवीसांना काही सांगत असलीत तर त्याचा अर्थ 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्यांची क्रेडीबिलिटी आहे. 'आधी चोऱ्या, आता बहाणे' असा पलटवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.

अधिकारी आणि फडणवीसांच्या भेटीबाबत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर आधी चोऱ्या, आता बहाणे, दरेकरांचा पलटवार
pravin darekar
Follow us on

मुंबई : कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. मलिक यांच्या या आरोपांना आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. नवाब मलिक यांचं फस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत आहे. जर आयएएस आणि आयपीएस अधिकारी देवेंद्र फडणवीसांना काही सांगत असलीत तर त्याचा अर्थ 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्यांची क्रेडीबिलिटी आहे. ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा पलटवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. ( Praveen Darekar responds to Nawab Malik’s allegations)

सरकार म्हणून तुमची क्रेडीबिलिटी नाही, नियंत्रण नाही, असं समजायचं का? असा सवालही दरेकर यांनी नवाब मलिकांना विचारलाय. आयएएस किंवा आयपीएस चुकीच्या गोष्टींना पाठबळ देत नसतील तर तेवढं फस्ट्रेट होण्याचं कारण नाही. या राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकार कुणाचही असो, एक सकारात्मक भूमिकाच घेतली आहे. विकास किंवा जनहिताचा उद्देश्य नसेल तर अधिकारी मदत करत नाहीत. म्हणून विरोधी पक्षनेत्याकडे माहिती जात असेल. पण ठरवून किंवा मुद्दामहून कुणी अशा प्रकारची माहिती देण्याचं काही कारण नाही, असंही दरेकर म्हणाले.

..तर चौकशीला का घाबरता?

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मिडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

‘त्या’ रांगेत जाऊन बसण्यासाठी शिवसेनेला शुभेच्छा

असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी 36 नगरसेवकांपैकी 23 मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

नवाब मलिकांचा आरोप काय?

काही अधिकारी या सरकारवर आरोप करत आहेत. त्यांच्या फडणवीसांसोबत आरोप करण्यापूर्वी बैठका झाल्या आहेत. ठरवून कटकारस्थान केलं जात आहे. वेळ आली तर त्याची माहितीही देऊ. कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते आरोप करण्यापूर्वी कुठे भेटले आणि कसे भेटले याची माहिती देऊ, असं ते म्हणाले. फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर आरोपांची मालिका सुरू झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. देशातील संस्था आणि एजन्सी याचा राजकीय वापर होतो हे आता लपून राहिले नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता कोर्टानेही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते जेवढे हैराण करतील तेवढी जनता आमच्यासोबत राहील, असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

VIDEO: मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांच्या आरोपाने खळबळ

मोहन भागवतांनी माझ्या ज्ञानात भर घातली, भागवतांच्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा खोचक टोला

Praveen Darekar responds to Nawab Malik’s allegations