काँग्रेस हरल्यावर देश हरला कसं म्हणता? : नरेंद्र मोदी

| Updated on: Jun 26, 2019 | 2:36 PM

राष्ट्रपतींच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज राज्यसभेत अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी मोदींनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार हल्ला केला.

काँग्रेस हरल्यावर देश हरला कसं म्हणता? : नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज राज्यसभेत अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी मोदींनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार हल्ला केला. वायनाडमध्ये हिंदुस्थान हरला का? रायबरेलीमध्ये भारत हरला का? मग काँग्रेस हरल्यावर देश हरला कसं म्हणता? असा खडा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.

मीडियामुळे निवडणुका जिंकल्याचं म्हणत माध्यमांना शिव्या घालण्यात आल्या, पण मीडिया बिकाऊ आहे का? त्यांना विकत घेऊन निवडणुका जिंकता येऊ शकतात? तसं असेल तर मग तामिळनाडूसारख्या राज्यालाही हे लागू होतं का?, अशी प्रश्नांची सरबत्ती नरेंद्र मोदींनी केली.

ईव्हीएमच्या नावाने खापर फोडलं जातं. विरोधकांनी आपले अपयश लपवण्यासाठी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र निवडणूक आयोगाने ईव्हीएमला आव्हान देण्यासाठी आमंत्रण दिलं होतं तेव्हा राष्ट्रवादी आणि सीपीएमशिवाय कोणताही पक्ष तिकडे फिरकला नाही, असं मोदी म्हणाले.  आम्ही राजकारणातही नव्हतो, तेव्हाच काँग्रेसने ईव्हीएम आणले असं त्यांनी सांगितलं.


न्यायालयांनीही ईव्हीएमवर विश्वास दाखवला.  विरोधकांनी आपले अपयश लपवण्यासाठी ईव्हीएमवर शंका घेतली. काँग्रेसला विजय पचवता येत नाही आणि पराभवही स्वीकारता येत नाही, असा हल्ला मोदींनी चढवला.


देशपातळीवर एकच मतदार यादी असावी. एक देश एक निवडणुकीला विरोध का, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला. जीएसटीला विरोध, ईव्हीएमला विरोध, डिजीटलला विरोध सर्वाला विरोध ही काँग्रेसची रणनीती असल्याचं मोदी म्हणाले.