प्रियंका गांधींनी करुन दाखवलं, राजस्थानमध्ये घोंघावणारं राजकीय वादळ अखेर शमलं

| Updated on: Aug 14, 2020 | 12:19 AM

राजस्थानमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर आज (13 ऑगस्ट) पूर्णविराम मिळाला आहे (Priyanka Gandhi Play important role for Sachin Pilot homecoming).

प्रियंका गांधींनी करुन दाखवलं, राजस्थानमध्ये घोंघावणारं राजकीय वादळ अखेर शमलं
Follow us on

जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर आज (13 ऑगस्ट) पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज संध्याकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राजस्थान विधानसभेचं उद्यापासून अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी पायलट गहलोत यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे (Priyanka Gandhi Play important role for Sachin Pilot homecoming).

राजस्थानच्या राजकारणात गेल्या महिन्याभरात अनेक घडामोडी घडल्या. काँग्रेसमधील मतभेद 10 जुलै रोजी उघडपणे समोर आले. अशोक गहलोत आणि सचिन पायलट असे दोन गट विभक्त झाले. सचिन पायलट बंड पुकारुन वेगळा पक्ष किंवा भाजपशी हातमिळवण करणार, असं चित्र निर्माण झालं. मात्र, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या शिष्टाईमुळे सचिन पायलट यांचं बंड शमलं (Priyanka Gandhi Play important role for Sachin Pilot homecoming).

प्रियांका गांधी यांनी कसे प्रयत्न केले?

राजस्थानात महिन्याभरापूर्वी काँग्रेसमध्येच दोन गट पडल्यानंतर प्रचंड वेगाने घडामोडी घडत होत्या. सचिन पायलट यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन, त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी दररोज झडत होत्या. या सर्व घडामोडींदरम्यान सचिन पायलट यांची बाजू थोडी कमकुवत पडू लागली. या संधीचा फायदा घेत प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यात त्यांना यश आलं.

प्रियांका गांधी यांनी सर्वात आधी सचिन पायलट यांचे सासरे फारुक अब्दुल्ला आणि मेहुणे उमर अब्दुल्ला यांच्याद्वारे सचिन पायलटांशी संपर्क साधला. त्यानंतर काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा आणि भंवर जितेंद्र सिंह यांनी सचिन पायलट यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनीदेखील मध्यस्ती केली.

प्रियांका गांधींच्या प्रयत्नांमुळे अखेर सचिन पायलट आपली बाजू मांडण्यासाठी बैठकीसाठी तयार झाले. सचिन पायलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी भेटीसाठी गेले. या बैठकीत त्यांनी आपली बाजू मांडली. या बैठकीनंतर सचिन पायलट जयपूरला आले. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी बुधवारी (12 ऑगस्ट) काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांना जयपूरला पाठवलं.

केसी वेणुगोपाल बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जयपूरला पोहोचले. तिथे त्यांनी सर्वातआधी गहलोत यांच्या गटातील आमदारांची भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी (13 ऑगस्ट) सकाळी वेणुगोपाल आणि प्रियांका गांधी यांनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्याशी चर्चा करुन संध्याकाळी पाज वाजता आमदारांच्या बैठकीबाबत ठरवलं.

दरम्यान, आमदारांची बैठक कुठे घ्यावी, यावरुनही प्रचंड गोंधळ झाला. ही बैठक सुरुवातीला फेयरमाउंट हॉटेलमध्ये आयोजित करण्याचं ठरलं. त्यानंतर मुंख्यमंत्री निवासस्थानी ठरलं, पण पायलट गटातील काही आमदारांनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर ही बैठक विधानसभेत होईल, असं ठरलं. मात्र, त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक होईल, असं निश्चित झालं.

केसी वेणुगोपाल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास गहलोत यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत गहलोत यांची फोनवर बातचित करुन दिली. प्रियांका गांधींच्या आदेशानुसार गहलोत यांनी सचिन पायलट यांना फोन लावला. त्यानंतर थोड्या वेळाने सचिन पायलट मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. तिथे गहलोत आणि पायलट यांच्यात जवळपास पाऊणतास चर्चा झाली.

या बैठकीनंतर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली. “मी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा आभारी आहे की, त्यांनी मला पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्याचबरोबर पक्षाच्या अध्यक्षांचादेखील आभारी आहे की, त्यांनी पुन्हा पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं”, असं सचिन पायलट म्हणाले.

संबंधित बातम्या :

सचिन पायलट हायकोर्टात, हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी खिंड लढवणार

फाडफाड इंग्रजी आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, गहलोतांचा पायलटांना टोला