“काँग्रेस मंत्री निष्क्रिय” पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्षांचेच महाविकास आघाडीविरुद्ध आंदोलन

| Updated on: Jul 19, 2020 | 2:56 PM

काँग्रेसचे आळंदी शहर अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्धच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काँग्रेस मंत्री निष्क्रिय पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्षांचेच महाविकास आघाडीविरुद्ध आंदोलन
Follow us on

पिंपरी चिंचवड : लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात काँग्रेसचे मंत्रीही निष्क्रिय ठरत आहेत, असा दावा करत पुण्यातील काँग्रेस पदाधिकारीच आंदोलनाला बसणार आहे. काँग्रेसचे आळंदी शहर अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्धच आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Pune Alandi City Congress President Protest against Mahavikas Aghadi Government)

“लॉकडाऊनमध्ये नागरिकांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण हे महाविकास आघाडीचे सरकार करु शकले नाही. काँग्रेसचे मंत्रीही निष्क्रिय ठरत आहेत” असा आरोप करत पुण्यातील आळंदी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर आंदोलन करणार आहेत.

“सरकारमध्ये काँग्रेसचे काहीही चालत नाही. जनतेची कामे होत नसतील तर अशा सरकारमध्ये पक्षाने रहावे तरी कशाला?” अशी भूमिका वडगावकर यांनी घेतली आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंची थोरातांनंतर पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा, राजस्थान सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री सावध

वडगावकर यांनी आंदोलनासाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त शोधला आहे. आळंदीच्या इंद्रायणी काठी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केले जाणार आहे.

दरम्यान, राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी संवाद वाढवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत सत्तेतील घटक पक्षांशी संवाद वाढवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.