पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. उमेदवार हे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आपल्यालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना याचा चांगलाच अनुभ आला.
गेली पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी सायंकाळी गिरीश बापट हे पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत असताना तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं.
आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत, मात्र आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही आता आम्ही मतदान का करावे, असा प्रश्न उपस्थित करत या परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारला.
यावेळी गिरीश बापट यांची चांगलीच भांबेरी उडाली. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक प्रचंड वैतागले होते. त्यामुळे गिरीश बापट यांना मदत मागत असतानाच नागरिकांच्या या रोषाला सामोरे जावे लागल्याने भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पाहा व्हिडीओ :
पाणीच नाही, मग मत का देऊ? पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांच्या तोंडचं पाणी पळालं! https://t.co/1QPs5RGdhW pic.twitter.com/kmUGjjBzqe
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2019
पुण्यात 23 एप्रिलला मतदान
पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट, तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत. येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात मतदान होणार आहे.