रायगडमध्ये लॉकडाऊनवरुन राजकीय मतभेद, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा तटकरे बापलेकीवर नाव न घेता निशाणा

| Updated on: Jul 16, 2020 | 10:51 AM

कारखानदारांना राजकीय पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी तटकरे बापलेकीचे नाव न घेता केला.

रायगडमध्ये लॉकडाऊनवरुन राजकीय मतभेद, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा तटकरे बापलेकीवर नाव न घेता निशाणा
Follow us on

रायगड : कारखाने सुरु करुन नागरिक, छोटे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना वेठिस धरणार असाल, तर माझा व्यक्तिगत विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांनी घेतली आहे. कारखानदारांना राजकीय पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप माणिकराव जगताप यांनी तटकरे बापलेकीवर नाव न घेता केला. (Raigad Congress Chief Manikrao Jagtap slams Sunil Tatkare Aditi Tatkare)

“लॉकडाऊन या विषयावर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने विचार करण्याची गरज आहे. रत्नागिरी जिल्हा लॉकडाऊन करुन काय रिझल्ट निघाले पाहिले. लोक बाहेर निघतात, हायवे बंद करतात, ज्याच्या मनाला वाटेल, तसा जो-तो वागतो. करायचे असेल तर सगळे कारखाने बंद करुन 100% रायगड जिल्हा लॉकडाऊन करा” अशी मागणी माणिकराव जगताप यांनी केली.

“कोरोनाच्या आजाराला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. गेले सहा महिने जसे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सांगतात, तशी जनता वागते. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, अनेकांचे रोजगार गेले, हातावर पोट असणारी रोजीरोटी बंद पडली.” असे जगताप म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केला आहे. JSW, JNPT, RCF, रिलायन्स असे असंख्य मोठे कारखाने येथे आहेत. महाड, रोहा, पनवेल, तळोजा एमआयडीसी आहेत. सरकार एकीकडे सांगतय नागरिकांनी बंद पाळला पाहिजे, नागरिक पाळतात. पण कारखानदार पाळतात का? फार्मा कंपनीला सूट द्यायची, मग त्यांना संबंधित कंपन्यांना सूट द्यायची, म्हणजे किती कारखाने बंद राहिले?” असा सवाल त्यांनी विचारला.

संबंधित बातमी : रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन, अदिती तटकरे यांची घोषणा

“कुठलाही कारखानदार बंद करत नाही, त्यांना राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असते. त्याचा परिणाम आपण रोह्यात बघतोय. सुदर्शनमध्ये 100 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्याचा परिणाम रोह्यातील नागरिक आणि गरीब जनतेला भोगावा लागतोय” असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचे नाव न घेता माणिकराव जगताप यांनी केला.

कोण आहेत माणिकराव जगताप?

काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष
महाड मतदारसंघातून माजी विधानसभा आमदार
महाड नगरपालिकेवर मागील 15-20 वर्ष वर्चस्व
रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख
दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील काँग्रेसचे मोठे नेते