शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले, दूध दराच्या मुद्द्यावरुन आक्रमक, राज्यपालांना लक्ष घालण्याची विनंती

| Updated on: Oct 29, 2020 | 11:40 AM

महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना मिळणारा दूधाचा भाव आणि वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून लक्ष घालण्याची विनंती राज यांनी राज्यपाल कोश्यारी यांना केली.

शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले, दूध दराच्या मुद्द्यावरुन आक्रमक, राज्यपालांना लक्ष घालण्याची विनंती
Follow us on

मुंबई: लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दराचा मुद्दा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे 17 ते १८ रुपये देतात आणि स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 27 ते 28 रुपये दर मिळावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray request to the Governor to pay attention to the milk issue )

राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज यांच्यासोबत मुलगा अमित ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना एक निवदेन दिले. त्यात शेतकऱ्यांच्या दुधाला भाव आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

‘शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्यांना एका लिटरमागे 17 ते १८ रुपये देतात. आणि स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे आधिच शेतकरी गांजलेला असतो. त्यात वाढत्या महागाईमुळं गुरांची देखभालही खूप महाग झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 27 ते 28 रुपये दर मिळावा’, अशा मागणीचं निवेदन राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं. त्याचबरोबर ‘शेतकऱ्यांच्या दुधाला भाव आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आम्ही पाठपुरावा करत आहोत. पण सरकारकडून मिळणारा अपेक्षित प्रतिसाद खूप प्रलंबित आहे. त्यामुळं सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून आपण या विषयात लक्ष घालून सरकारला निर्देश द्यावे आणि जनतेला दिलासा द्यावा’, अशी मागणीही राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

सरकार आणि राज्यपालांमधील ‘सख्य’!, राज ठाकरेंचा टोला

‘राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याप्रश्नांवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. पण सरकार पावलं उचलत नाही. त्यामुळं राज्यपालांना निवेदन दिलं आहे. मात्र, राज्यपाल आणि राज्य सरकारमधील सख्य पाहता हे विषय कधी मार्गी लागतील सांगता येत नाही,’ असा टोला राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

“कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही”

राज्यात प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.

संबंधित बातम्या:

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray Meet Bhagat Singh Koshiyari | वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन : राज ठाकरे

Raj Thackeray request to the Governor to pay attention  to the milk issue