Raj Thackeray : राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या बृजभूषण सिंहांच्या रॅलीत केवळ 5 हजार लोक! मनसेचे अविनाश जाधव नाकावर टिच्चून अयोध्येत

| Updated on: Jun 05, 2022 | 11:39 PM

बृजभूषण सिंहांच्या विरोधानंतर आणि शस्त्रक्रियेमुळे कारण देत राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. असं असलं तरी बृजभूषण सिंह यांनी आज अयोध्येत रॅली काढली. मात्र, त्यांच्या रॅलीत केवळ 5 हजार लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली! तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज अयोध्यात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं.

Raj Thackeray : राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या बृजभूषण सिंहांच्या रॅलीत केवळ 5 हजार लोक! मनसेचे अविनाश जाधव नाकावर टिच्चून अयोध्येत
बृजभूषण सिंह, अविनाश जाधव
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. राज ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राज यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करुन शिवसेनेची अधिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी आपण 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला कडाडून विरोध केला. विरोधामागे कारण होतं राज ठाकरे यांनी 2008 साली पुकारलेलं उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलन. या विरोधानंतर आणि शस्त्रक्रियेचं कारण देत राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. असं असलं तरी बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी आज अयोध्येत शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, त्यावेळी त्यांच्या रॅलीत केवळ 5 हजार लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली!

राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील नागरिकांची किंवा साधू संतांची माफी मागावी आणि मगच अयोध्या दौऱ्यावर यावं, अशी भूमिका बृजभूषण सिंहांनी घेतली. इतकंच नाही तर माफी न मागता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आले तर 5 लाख लोक घेऊन त्यांना रोखणार असा दावाही त्यांनी केला होता. राज ठाकरे यांचा बापही अयोध्यात प्रवेश करु शकणार नाही, अशी वल्गनाही सिंह यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचवेळी महाराष्ट्रातून बृजभूषण सिंहांना रसद पुरवली जात असल्याचा आरोपही केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर मी माझ्या कार्यक्रमांना कुठल्याही पोलीस प्रकरणात अडकू देणार नाही. तसंच आपल्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेचं कारण देत त्यांनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.

शरयू किनाऱ्यावरुन बृजभूषण सिंहांची राज ठाकरेंवर टीका

मात्र, 5 जून रोजी रॅली काढणार असं बृजभूषण सिंह यांनी सांगितलं होतं. त्यानसार यांनी आज गोंडा ते अयोध्या अशी रॅली काढली. मात्र या रॅलीत 5 हजार लोकच सहभागी झाले होते. शरयू नदीवर त्यांनी महाआरतीही केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. अहंकारातून राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही आणि त्यामुळेच ते अयोध्येला येऊ शकले नाहीत, असा आरोप त्यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

अविनाश जाधव आणि दिलीप धोत्रे 5 जूनलाच अयोध्येत!

राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेचं कारण देत अयोध्या दौरा स्थगित केला. मात्र, 5 जूनचाच मुहूर्त साधत मनसे नेते अविनाश जाधव आणि दिलीप धोत्रे अयोध्येत पोहोचले. त्यांनी रामलल्लाचं दर्शनही घेतलं आणि तिथून निधून ते मुंबईत दाखलही झाले. अयोध्येत दाखल झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं. ‘आम्ही बरेच महाराष्ट्र सैनिक अयोध्येत आलो आहोत. रामलल्लाचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे. मी सर्व मराठी माणसांना विनंती करेन की येथे आले पाहिजे. आज 5 तारीख असून एक मराठी माणूस अयोध्येत आला आहे आणि रामलल्लांचे दर्शन घेतले आहे’, असं जाधव यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलंय.