सदाभाऊ खोत फालतू, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन मी वेळ वाया घालवणार नाही : राजू शेट्टी

| Updated on: Nov 17, 2020 | 3:51 PM

सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना आज (17 नोव्हेंबर) सकाळी कडकनाथ कोंबड्याची उपामा दिली होती. या टीकेला शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Raju Shetti slams Sadabhau Khot).

सदाभाऊ खोत फालतू, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन मी वेळ वाया घालवणार नाही : राजू शेट्टी
Follow us on

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यात सध्या कलगीतुरा रंगला आहे. सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना आज (17 नोव्हेंबर) सकाळी कडकनाथ कोंबड्याची उपामा दिली होती. या टीकेला राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Raju Shetti slams Sadabhau Khot).

“सदाभाऊ खोत हे फालतू आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपला वेळ वाया घालवणार नाही. सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा”, असं राजू शेट्टी म्हणाले (Raju Shetti slams Sadabhau Khot).

“कालपर्यंत ज्यांना खांद्यावर घेऊन नाचावंसं वाटत होतं, आज त्यांचं बोलणं कोंबड्यासारखं वाटत आहे. सादभाऊ खोत यांची आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केली आहे”, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

“सदाभाऊ खोत यांच्या कितीतरी क्लिप आमच्याकडे आहेत. मी मेलो तरी शेतकरी संघटना सोडणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही, असं ते म्हणाले होते”, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

वादाचं कारण काय?

सदाभाऊ खोत यांनी काल (16 नोव्हेंबर) राजू शेट्टींना मैत्रीचा हात केला होता. पण राजू शेट्टी यांनी तो प्रस्ताव झिडकारला. उलट राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर सडकून टीका केली. “ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत. त्यांच्याबरोबरच मी काम करतो”, असा टोला शेट्टी यांनी लगावाला. त्यांच्या या टीकेला खोत यांनी प्रत्युत्तर दिलं. “पंचवीस वर्ष सदाभाऊचा हात हातात होता, तेव्हा रोज काशीला जात होते, आता गोमुत्राने आंघोळ करताय का?”, असा खोचक सवाल खोत यांनी केला.

सदाभाऊ खोत यांनी आज (17 नोव्हेंबर) सकाळीसुद्धा राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली. ‘कडकनाथ कोंबडा सातत्याने पहाटे आरोळी ठोकतो’ असं म्हणत खोतांनी शेट्टींवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर “हा सदाभाऊ खोत जिवंत असेपर्यंत तुमच्या संघटनेत परत येणार नाही”, असं दखील सदाभाऊ म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर देत “खोत यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन मी वेळ वाया घालवणार नाही”, असा टोला लगावला.

संबंधित बातम्या :

‘शेतकऱ्यांच्या पोरांवर ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्यासमोर यांनी लोटांगण घातलं’, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर पलटवार

पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही; राजू शेट्टींचा खोत यांच्याशी हातमिळवणीस नकार