‘शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही’, राजू शेट्टींनी महाविकास आघाडीविरोधात दंड थोपटले?

| Updated on: Feb 13, 2022 | 5:33 PM

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण, भूमी अधिग्रहण कायदा, ऊस दराचा मुद्दा, वीज वसुली आदी विषयांवरुन राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, असा इशाराच शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, राजू शेट्टींनी महाविकास आघाडीविरोधात दंड थोपटले?
राजू शेट्टी यांची सरकारवर टीका
Follow us on

कोल्हापूर : माजी खासदार आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) दंड थोपटले आहेत का? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी राजू शेट्टी हे सक्रिय होते. इतकंच नाही तर ते महाविकास आघाडीचे सूचकही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण, भूमी अधिग्रहण कायदा (Land Acquisition Act), ऊस दराचा मुद्दा, वीज वसुली आदी विषयांवरुन राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, असा इशाराच शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

महाविकास आघाडी तयार होत असताना अनेकांचे उंबरे झिजवणाऱ्यांपैकी मी होतो. शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवावा हा हेतू होता. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार असतील तर गप्प बसून चालणार नाही. गेल्या दोन वर्षांत ज्या काही गोष्टी चुकीच्या वाटल्या त्या लक्षात आणून देणं महत्वाचं वाटलं. दोन वर्षे हा काळ भरपूर झाला. प्रत्येक वेळी पैसे नाहीत म्हणता. मग मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, महागडे प्रोजेक्ट ज्यात कंत्राटदारांचा समावेश आहे ते प्रकल्प कसे राबवता?, कर्जमाफीचं काय झालं? भूमी अधिग्रहण कायदा का आणला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेट्टी यांनी केली आहे.

छोट्या पक्षांमध्ये अस्वस्थता – शेट्टी

महाविकास आघाडी निर्माण झाली तेव्हा मी सूचक होतो. मात्र, त्यानंतर एकही बैठक झाली नाही. मग हे नाटक कशासाठी? आमची तीनच पक्षांची आघाडी आहे हे तरी जाहीर करा. छोट्या पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. आम्ही भेटतो तेव्हा ती नाराजी दिसते. ते योग्य वेळेची वाट पाहत असतील, असंही शेट्टी यावेळी म्हणाले. राज सरकारला लिहिलेल्या पत्राच्या उत्तराची थोडे दिवस वाट पाहीन. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडीला मदत केली तसा उपद्रवही देऊ शकतो, असा इशाराही शेट्टी यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

वाईन विक्रीच्या धोरणावर शेट्टींकडून संशय व्यक्त

दरम्यान, किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा सरकारचा निर्णय आणि आण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याबाबत विचारलं असता, शेट्टी म्हणाले की, आण्णा हजारे काय म्हणाले मला माहित नाही. वाईन प्रकरणात शेतकऱ्याला विनाकारण बदनाम केलं जात आहे. वर्षानुवर्षे राज्यात वाईन विक्री होतेय. त्याच्या आडून वेगळं धोरण दिसत आहे. काही नेत्यांच्या वाईन प्रकल्पांना अनुदान, कर्जाला हमी द्यायची, असं काही तरी प्रकरण दिसत असल्याचा संशयही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केलाय.

15 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारही शेतकऱ्यांच्या हिताविरोधात काम करत आहे. त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यासाठी मंगळवार, दि 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. तसंच रत्नागिरी-सोलापुर रस्ता भुसंपादन बेकायदेशीर आहे. शेतकऱ्याच्या मुळावर उठणाऱ्याला ऊसाचा बुडका घेवून वटणीवर आणू असा सज्जड दमच शेट्टी यांनी भरलाय. ते आज हेरले इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

इतर बातम्या :

हा जातीभेद नाही का? आराधना बिल्डरच्या जाहिरातीतील आव्हाडांना काय खटकलं?

Video : राजेंचा नादच खुळा, घातला पुन्हा कॉलरला हात सगळेच फ्लॅट, सिद्धार्थ जाधव म्हणाला…

तुम्ही पाटील आहात जोशी बुवाचं काम कधीपासून करायला लागलात?; भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल