Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडूनही सहावा उमेदवार, घोडेबाजार होणार? जयंत पाटील, अनिल परब म्हणतात…

| Updated on: May 30, 2022 | 4:39 PM

अर्ज घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. तर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही घोडेबाजार होईल असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलंय.

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडूनही सहावा उमेदवार, घोडेबाजार होणार? जयंत पाटील, अनिल परब म्हणतात...
जयंत पाटील, अनिल परब
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) शिवसेनेकडून सहावा उमेदवार दिल्यानंतर आता भाजपकडूनही धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होणार असा आरोप केला जातोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजप घोडेबाजार करणार, असा आरोप केलाय. मात्र, घोडेबाजार होऊ नये असं भाजपलाही वाटत असेल. त्यामुळे भाजपवाले नक्कीच तिसरा अर्ज मागे घेतील असं वाटतं. अर्ज घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलाय. तर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही घोडेबाजार होईल असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलंय.

भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याचं जयंत पाटील म्हणाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यानंतर पाटील माध्यमांशई बोलत होते.

‘उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल’

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही, असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

‘निवडणुकीच्या आधी आम्ही हरणार असं कुणीच बोलत नाही’

अनिल परब म्हणाले की, मला वाटत नाही. घोडेबाजार होईल. प्रत्येक माणूस निवडणुकीच्या आधी आम्ही हरणार असं बोलत नाही. ही निवडणूक आहे. अपक्ष कुणाच्या बाजुने आहेत हे निकाल आल्यावर कळेल. उमेदवारी कुणाला द्यायची हे वरिष्ठ पातळीवर ठरवलं जातं. निकाल लागेल तेव्हा कुणी कसं गणित केलं ते समजेल. अपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असतील तर त्यांना मदत देतील. आमच्यासमोर असतील तर आम्हाला मदत देतील. निकाल लागल्यावर काय ते कळेलच. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं काहीतरी होतं, असंही परब यांनी म्हटलंय.

फडणवीसांचं गणित काय?

आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत, महाराष्ट्रातील आहेत. तसेच आमचे तिन्ही उमेदवार हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे काही लोक आम्हाला सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमच्या तिन्ही जागा राज्यसभेत होत्या. त्यामुळे आम्ही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांनीही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांना जर घोडेबाजार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी आपला एक उमेदवार मागे घ्यावा, असं सांगतानाच आम्ही घोडेबाजार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी आम्ही महाडिक यांना मैदानात उभे केले आहे. त्याचा आम्ही काही तरी विचार केला असेलच ना… काही तरी स्ट्रॅटेजी ठरवली असेलच ना. पण ही स्ट्रॅटेजी आम्हाला उघड करायची नाहीये, असं फडणवीस यांनी सांगितलं.