Rajya Sabha Election 2022: आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदेंनी नेमकं काय केलं होतं? ज्यामुळे मतमोजणी लटकलीय

| Updated on: Jun 10, 2022 | 7:03 PM

भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. तर काँग्रेसनेही भाजपच्या सुधीर मुनगंटीवर यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. भाजपच्या आक्षेपावर आता सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार आहे.

Rajya Sabha Election 2022: आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदेंनी नेमकं काय केलं होतं? ज्यामुळे मतमोजणी लटकलीय
आव्हाड, यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपचा आक्षेप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज राज्यात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election)सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP)असा दोन्हींकडून आपल्या विजयाचा दावा करण्यात येत आहे, अशातच आता एक मोठी अपडेट समोर आलीय. भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि यशमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. तर काँग्रेसनेही भाजपच्या सुधीर मुनगंटीवर यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. भाजपच्या आक्षेपावर आता सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यास दोन तासांपेक्षा जास्त विलंब झाला आहे. 5 वाजता ही मतमोजणी सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता याला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

कुणाचा काय आक्षेप?

मतदान प्रक्रिया सुरू असताना दोन्ही बाजुंकडून आक्षेपामुळे आता नवे आरोप सुरू झाले आहेत.  राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेत्या यशमती ठाकूर यांच्या मतांवर भाजप नेत्यांकडून आक्षेप घेतला गेला आहे. ठाकूर यांनी मतपत्रिका नाना पटोलेंच्या हाती दिल्याचा आरोप आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांना मतपत्रिका दाखवल्याचा आरोप आहे. तसेच सुहास कांदे यांनी भाजप नेत्यांना मतपत्रिका दाखवल्याचा आरोप करत हा आक्षेप घेतला आहे. आता भाजपच्या आक्षेपावर सुनावणी सुरू आहे तर ही मतं रद्द करावी अशी मागणी भाजपने आता लावून धरली आहे.

महाविकास आघाडीने आरोप फेटाळले

मात्र मतपत्रिका दुसऱ्याच्या हातात दिली नाही म्हणत दोन्ही नेत्यांनी भाजपकडून होणारे आरोप थेट फेटाळून लावले आहेत.  मी पाठमोरा उभा होतो, मी कोणतीही चूक केली नाही, फक्त आळवणींना सर्व करळतं का? आम्हाला काही कळत नाही का? असा सवाल आव्हाडांनी केलाय. तर भाजपकडून खोटे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, अशा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

तर काँग्रेसचा भाजपच्या मतावर आक्षेप

तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांनी मतपत्रिका दाखवल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलाय. हा आक्षेप अमर राजूरकर यांनी घेतला आहे. मतपत्रिका शेलारांकडे दिल्याने काँग्रेसचा आक्षेप आहे. तर काँग्रेसचा आक्षेप म्हणजे केवळ वेळकाढूपणा आहे, आम्ही कोणताही नियम मोडला नाही, असे भाजप नेते बावनकुळे यांनी म्हटलंय. तर मुनगंटीवरांकडून गफलत झाली आहे त्यामुळे आमचा आक्षेप बरोबरच आहे, आमचं मतदान पूर्ण झालं आहे, मात्र भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे, भाजप महाराष्ट्राची बदनामी करतंय त्याचा निषेध आहे, तसेच सुधीर मुनगंटीवारांची चूक व्हिडिओतही दिसतेय, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आता कुणाची मतं वैध ठरणार आणि कुणाची बाद ? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.