काँग्रेसने पाठिंबा काढताच अजितदादा आमच्यासोबत येतील, रामदास आठवलेंना खात्री

| Updated on: Dec 28, 2020 | 9:21 AM

महाराष्ट्रातील आगामी काळात निवडणुकांमध्ये रिपाइं पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं

काँग्रेसने पाठिंबा काढताच अजितदादा आमच्यासोबत येतील, रामदास आठवलेंना खात्री
रामदास आठवले आणि अजित पवार
Follow us on

पुणे : “राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात” असं वक्तव्य रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं. काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. आगामी काळातील निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने उतरणार असल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं. (Ramdas Athawale says Ajit Pawar will reunite with BJP once denies support)

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदरच आहे. कारण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला रे काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत” असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.

“म्हणून फडणवीस म्हणतात मी पुन्हा येईन…”

“अजितदादांनी म्हटलं की, एक म्हणतोय (देवेंद्र फडणवीस) मी येईन, आणि दुसरा म्हणतोय (चंद्रकांत पाटील) मी जाईन. देवेंद्र फडणवीस मी येईन, अशासाठी म्हणतात, की अजितदादा एक दिवस त्यांच्यासोबत येतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. अजितदादा एकदा तिथे जाऊन आलेले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षा आहे, की एक दिवस अजित पवार आपल्यासोबत येतील. आणि आपलं नवीन सरकार स्थापन करण्याची संधी आपल्याला मिळेल. अशी अपेक्षा असल्याने ते पुन्हा-पुन्हा सांगतात की मी पुन्हा येईन” असं रामदास आठवले म्हणाले.

“चंद्रकांतदादा कोल्हापूरला कधी जातात बघुया”

“चंद्रकांत पाटील सध्या ते कोथरुडचे आमदार आहेत. पण ते कोल्हापूरातून आले आहेत. ते कोल्हापूरला कधी जातात, हे बघुया. पण त्यांनी जाहीर केलं आहे, की मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यातच राहणार आहे. त्याला 5-25 वर्ष लागली तरी चालतील. भाजपच्या हातात जिल्ह्याची सत्ता आणणं, हे त्यांचं मिशन आहे” असंही आठवले म्हणाले.

(Ramdas Athawale says Ajit Pawar will reunite with BJP once denies support)