“मराठा आंदोलनातील केसेस मागे घेतल्या तसं भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या”

रामदास आठवले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

मराठा आंदोलनातील केसेस मागे घेतल्या तसं भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या
रामदास आठवले
| Updated on: Dec 18, 2022 | 2:58 PM

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसवर भाष्य केलंय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार आहे. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या आंदोलकाच्या केसेस मागे घेतल्या तसंच भीमा कोरेगाव प्रकरणातील (Bhimakoregoan) केसेस देखील मागे घ्या, अशी विनंती करणार आहे”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

“सभेला परवानगी द्या”

1 जानेवारीला भीमा कोरेगाव हा संघर्षशिल दिवस आहे. याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती. महार समाजाच्या इतिहासाची ती आठवण आहे. लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी तिथे जमतात. आधी फ्कत आमची सभा तिथं होत असतं पण आता खूप जणांची होते. पण प्रशासनाने निर्णय घेतला आहे की त्या परिसरात आता सभा घेता येणार नाही तो योग्य आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण बाहेर सभा घ्यायला परवानगी द्या, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही आठवले बोललेत. चंद्रकांतदादा राज्यातील सिनियर नेते आहेत. पण त्यांच्या या वक्तव्याशी कुणीही सहमत नाहीये, असं आठवले म्हणालेत.

चंद्रकांतदादांनी भीक हा शब्दप्रयोग केला. त्यामुळे लोकांना रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की 307 मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणं योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे, असंही आठवले म्हणालेत.

मविआच्या महामोर्चावर आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी ही सध्या एकत्र आहेत. निवडणुकीदरम्यान एकत्र राहतील का नाही माहीत नाही. त्यांना आमदार सांभाळता आले नाहीत. म्हणून आता मोर्चे काढतात. राज्यपाल यांच्या वक्तव्यबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली आहे, असं आठवले म्हणालेत.