Narayan Rane : राणेंनी एका वाक्यातच मिटवला दसऱ्या मेळाव्याचा विषय..! मुख्यमंत्र्यांचे कौतुक अन् ठाकरेंना टोला

| Updated on: Sep 02, 2022 | 10:43 PM

महाराष्ट्रात सध्या जनतेच्या मनातले सरकार आहे. झालेला बदल जनतेने स्विकारला असून गेल्या दोन महिन्याच्या काळात शिंदे सरकारने अनेक निर्णय घेतले शिवाय ते जनतेच्या हिताचे असल्याचेही राणे यांनी सांगितले आहे. अल्पावधीमध्ये एवढे निर्णय घेणे म्हणजे सहजशक्य नाही. भाजप आणि शिंदे गटात असलेली एक वाक्यता यामुळेच हे शक्य झाले आहे.

Narayan Rane : राणेंनी एका वाक्यातच मिटवला दसऱ्या मेळाव्याचा विषय..! मुख्यमंत्र्यांचे कौतुक अन् ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई : शिवतीर्थावर यंदाचा (Dussehra Gathering) दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर अनेकांची मतभिन्नता असली तरी (Narayan Rane) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र, एका वाक्यात हा विषय मिटवला आहे. याबाबत त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी मेळावा हा शिंदे गटाचाच होणार हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवतीर्थावर मेळावा कुणाचा याचे उत्तर राणेंना सहजही देता आले असते. पण सर्वच बाबी आगोदरच सांगून उपयोग नाही. स्पॉटवर गेल्यावर कळेलची की असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल देत उत्तरही दिलेच आहे. एवढेच नाहीतर या दरम्यानच्या काळात (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय चांगला घेतला तो म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला घालवले, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

नारायण राणेंकडून सरकारचे कौतुक

महाराष्ट्रात सध्या जनतेच्या मनातले सरकार आहे. झालेला बदल जनतेने स्विकारला असून गेल्या दोन महिन्याच्या काळात शिंदे सरकारने अनेक निर्णय घेतले शिवाय ते जनतेच्या हिताचे असल्याचेही राणे यांनी सांगितले आहे. अल्पावधीमध्ये एवढे निर्णय घेणे म्हणजे सहजशक्य नाही. भाजप आणि शिंदे गटात असलेली एक वाक्यता यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे हीच खरी नैसर्गिक युती आहे. शिवाय ही तर सुरवात असून आगामी काळात राज्य हे एक वेगळ्या विकासाच्या वळणावर असेल असाही आशावाद राणे यांनी व्यक्त केला.

शिंदेंचा तो निर्णय राणेंना आवडला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू येथील नारायण राणेंच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी नारायण राणे यांनी ते मुख्यमंत्री पदी असतनाच्या आठवणींना उजाळा दिला तर हे सरकार जनतेचे सरकार आहे अशी भावना आता निर्माण होऊ लागली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारला घरी बसवण्याचा तो निर्णय आपल्याला सर्वात आवडल्याचेही राणे म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात असले तरी या बैठकीत उद्धव ठाकरे यांना राणेंनी टोला लगावला आहे.

म्हणून भेटीला महत्व..

कधीकाळी एकाच पक्षात असलेले नारायण राणे आणि एकनाथ शिंदे हे सेनेतून बाहेर पडले आहेत. शिवाय राणेंनी पक्ष सोडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका सबंध राज्याला माहिती आहे. त्यांनी कायम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आभारच मानले तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाच केली. आज त्यांच्याच भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले होते. त्यामुळे ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्यासोबतही आपल्या मनात काही नसल्याचे शिंदे यांनी दाखवून दिले अशी चर्चा रंगू लागली आहे.