औरंगाबादेत शिवसेना-भाजपच्या बंडखोरीत एमआयएमचा लाभ?

| Updated on: Oct 05, 2019 | 5:03 PM

या बंडखोरांचा प्रस्थापित उमेदवारांना फटका बसणार की बंडोबा थंडोबा होणार हा एक प्रश्न आहे. शिवाय औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघातही हेच चित्र आहे.

औरंगाबादेत शिवसेना-भाजपच्या बंडखोरीत एमआयएमचा लाभ?
Follow us on

औरंगाबाद : तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पण याचा थेट फायदा विरोधी पक्षातील उमेदवाराला होण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेतही (Shivsena bjp Rebels Aurangabad) असंच चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक उमेदवारांना बंडखोरांनी (Shivsena bjp Rebels Aurangabad) घेरण्याची रणनीती आखली आहे. या बंडखोरांचा प्रस्थापित उमेदवारांना फटका बसणार की बंडोबा थंडोबा होणार हा एक प्रश्न आहे. शिवाय औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघातही हेच चित्र आहे.

अब्दुल सत्तार यांची मातब्बर नेते म्हणून ओळख आहे. स्वतः अल्पसंख्याक समाजातून असूनही अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून आत्तापर्यंत दोन वेळा विजयावरती आपली मोहर उमटवली. याही वेळेला अब्दुल सत्तार यांचा गाडा सुसाट सुटलाय, पण त्यांच्या गाड्याला सिल्लोड मतदारसंघातील बंडखोर खीळ घालतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपच्या सुनील मिरकर आणि सुरेश बनकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर काँग्रेसच्या प्रभाकर पलोदकर यांनीही भाजप बंडखोरांच्या बळावर रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या विजयी रथाला बंडखोर खीळ घालतील का असा सवाल उपस्थित होतोय.

दुसरीकडे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात भाजपच्या शहराध्यक्षांनीच शड्डू ठोकले आहेत. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी महायुतीत असतानाही प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेचाच असलेल्या वैजापूर मतदारसंघातही भाजपने मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे. जिल्हा अध्यक्ष नामदेव जाधव आणि दीपक परदेशी या दोघांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर औरंगाबाद पश्चिम मतदार संघातही शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनीही बंडखोरी केली आहे.

औरंगाबाद जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, आजही 9 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेना आपल्या जागा लढवत आहे. मात्र त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपने तुंबळ बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला आलिंगन देऊन संपवण्याचा विचार करत आहे का असा सवाल सध्या मतदारांमधून विचारला जात आहे.

… तर थेट एमआयएमला लाभ

भाजप आणि शिवसेना यांची मतं विभागली गेल्यास काय होतं याचा अनुभव नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आला. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी हिंदू मतांमध्ये फूट पाडली आणि शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला, तर एमआयएमने विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही औरंगाबाद शहरात एमआयएमने विजय मिळवला होता. कारण, तेव्हाही शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. याही वेळेला बंडखोरी न रोखल्यास याचा थेट फायदा एमआयएमला होण्याची शक्यता आहे.