भीतीला या पोरांनी कधीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीये; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
आमदार रोहित पवार हे नुकताच दिल्लीत जंतर मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर आता त्यांनी पोस्ट शेअर करत तेथील विद्यार्थांविषयी सांगितले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात लाखो तरुण एकत्र आले असून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनात अनेक बडे विरोधी पक्ष नेते, बॉलिवूड कलाकार देखील सहभागी झाले. दरम्यान, एक दिवस आंदोलकाना हटवण्यासाठी अचानक लाठीचार्ज करण्यात आला. तरीही तरुण घाबरले नाहीत. त्यांनी आंदोलन चालूच ठेवले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘भीतीला या पोरांनी कधीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीये’ असे म्हटले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत, जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं टार्गेट फिक्स आहे… टार्गेट कम्प्लिट केल्याशिवाय ही पोरं हलणार नाहीत, हेच दाखवणारं चित्र रात्री बारा वाजता बघायला मिळालं… रात्री उशिरापर्यंत या पोरांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जात-धर्म-प्रांत-भाषा या सगळ्या भिंती तोडून देशभरातील युवा केवळ तिरंग्याखाली इथं एकवटलाय. विशेषतः भाजपाने उभारलेल्या जाती-धर्माच्या भिंती इथल्या युवांनी कधीच तोडून भुईसपाट केल्या आहेत. विविधतेतील एकता हे ज्याप्रमाणे भारताचं सौंदर्य आहे, ते खऱ्या अर्थाने इथं बघायला मिळालं असे म्हटले आहे.
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं टार्गेट फिक्स आहे…
टार्गेट कम्प्लिट केल्याशिवाय ही पोरं हलणार नाहीत, हेच दाखवणारं चित्र रात्री बारा वाजता बघायला मिळालं… रात्री उशिरापर्यंत या पोरांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जात-धर्म-प्रांत-भाषा या सगळ्या भिंती तोडून देशभरातील युवा… pic.twitter.com/JsVJHTaGOH— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 25, 2026
“खाद्यपदार्थ कुणी पाठवले हे कुणालाच कळत नाही”
पुढे त्यांनी म्हटले, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असला तरी वास्तवात ही मुलंच स्वतःहून शिस्त पाळताना दिसत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातील दानशूर मंडळी स्वतःहून या मुलांना खाद्यपदार्थांची ऑर्डर पाठवत होती. खाद्यपदार्थ कुणी पाठवले हे कुणालाच कळत नाही आणि कुणासाठी पाठवले हेही पाठवणाऱ्याला कळत नाही. या पाठवण्यामागे केवळ माणुसकी आणि देशाचं भविष्य असलेल्या युवांची काळजी ही एकमेव प्रामाणिक भावना इथं दिसली.
शेवटी त्यांनी, अहंकारी सत्तेने या मुलांवर लाठ्या चालवून त्यांना जखमी केलं असलं तरी अनेक डॉक्टर मंडळींनी इथं स्वयंस्फूर्तीने सेवा सुरू केलीय. अनेक मुलांना विचारलं की, ‘‘आपको डर लगता है क्या?’’ यावर ‘‘हम किसी से डरते नहीं’’, हे त्यांचं अत्यंत आश्वासक उत्तर होतं. इथले सर्वच तरुण अत्यंत जबाबदार असून या तरुणाईची भाषा सरकारने समजून घेऊन वेळीच निष्क्रिय मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. सरकारने गेली बारा वर्षे निर्माण केलेल्या दहशतीला, भीतीला या पोरांनी कधीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय. त्यामुळं त्यांना जर सरकारने बंदुकीचा, लाठीचा धाक दाखवला, तरीही त्याचा काही उपयोग नाही. सरकारने आतातरी शहाणं व्हावं आणि द्वेषाऐवजी प्रेमाची, विसंवादाऐवजी संवादाची, तोडण्याऐवजी जोडण्याची, जाती-धर्मात वाद लावण्याऐवजी बंधुभाव जपण्याची भाषा बोलावी. कारण सरकारच्या लबाडीला बळी पडणारी ही पिढी नाही आणि या पिढीला घाबरवण्याचा प्रयत्न तर आता सरकारने स्वप्नातही करू नये… झालं ते बस झालं..आता निष्क्रिय मंत्र्याचा राजीनामा घ्या.. आणि देशाची भावना समजून आतातरी द्वेषाच्या निखाऱ्यावर राजकीय फायद्याच्या भाकरी भाजायचं बंद करा.. असं म्हटलं आहे.