NEET पेपरफुटीचा विद्यार्थ्यांनी फायदा… निर्मला सीतारमण हे काय बोलून गेल्या? वक्तव्याने मोठा वाद
Nirmala Sitharaman on NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्याने वाद उद्भवला आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. राऊतांनी तर त्यांना मूर्ख बाई अशी टीका केली आहे. काय म्हणाल्या सीतारमण?

Nirmala Sitharaman on NEET Paper Leak: युजीसी-नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीविरोधात CJP चे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दावा केला आहे की काही विद्यार्थ्यांनी पेपरलीकचा फायदा उचलला आणि आव्हान स्वीकारून यश मिळवले. ANI ला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण यांनी सांगितले की, असे पण काही तरुण आहेत जे समोर येऊन सांगत आहेत की, प्रश्नपत्रिका फुटल्याने मला अत्यंत वाईट वाटले. पण त्यानंतर मी आव्हान स्वीकारले आणि फायदा घेतला. त्यानंतर परीक्षेची चांगली तयारी केली. त्यामुळे परीक्षेत चांगली कामगिरी करता आली. अनेक तरुणांनी हे आव्हान स्वीकारले आणि घवघवीत यश मिळवले.
पंतप्रधानांचे कारवाईचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिल्याचे त्या म्हणाल्या. ज्या लोकांनी परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आणले . त्याचे उल्लंघन केले. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन मोदी यांनी दिल्याचे सीतारमण म्हणाल्या. नीट परीक्षा पुन्हा लवकर घेणे आणि लागलीच त्याचा निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी मदत झाल्याचा दावा त्यांनी केला.
विरोधकांवर निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पेपरफुटीवर सरकारने लागलीच उपाययोजना केली. त्यांनी विरोधकांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली. हा मुद्दा देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. खासकरून त्यांच्या परीक्षेच्या तयारीविषयी आहे. पेपर लीक आणि पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अत्यंत संवेदनशील असतात. जर सरकार संवेदनशील नसते अथवा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती तर विरोधी पक्षांचा आरोप समजू शकला असता. पण पंतप्रधानांनी याप्रकरणात उत्तर दिले आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. प्रश्नपत्रिका फुटीसाठी जबाबदार लोकांना शिक्षा देण्यात येईल असे पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याने विरोधकांच्या दावे तथ्यहिन असल्याचे उघड झाल्याचे सीतारमण म्हणाल्या. NEET प्रश्नपत्रिका खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी अशा लोकांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
