अयोध्या निकाल लवकरच, सेना-भाजप युती टिकणे आवश्यक : संघ

| Updated on: Nov 06, 2019 | 8:36 AM

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप युती टिकून रहावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे.

अयोध्या निकाल लवकरच, सेना-भाजप युती टिकणे आवश्यक : संघ
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्रिपद, सत्तेचं समसमान वाटप यासारख्या मुद्द्यांवर अडलेली चर्चा पुढे सरकून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा सुटावा, म्हणून शिवसेना-भाजप यांच्यात मध्यस्थीसाठी रा. स्व. संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना-भाजप यांच्यात मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरु (RSS to mediate in Shivsena BJP) असल्याची माहिती आहे.

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर युती टिकून रहावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. अयोध्या प्रकरणी लवकरच निकाल येणार आहे. अशा स्थितीत सेना-भाजप एकत्र असणं गरजेचं असल्याचं संघाचं मत आहे. संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

सत्तास्थापनाचा पेच सुटता सटत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कालच नागपुरातील संघाच्या मुख्यालयात गेले होते. फडणवीसांनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. या बैठकीत राज्याच्या सत्तास्थापनेबाबत काही महत्त्वाचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, मोहन भागवत कोंडी फोडणार?

मुख्यमंत्र्यांची ही भेट अत्यंत गोपनीय होती. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रम पत्रिकेत या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलणंही टाळलं होतं.

संघाच्या शाखांचं भक्कम पाठबळ नेहमीच भाजपला राहिलं आहे. अनेकदा संघाचे प्रचारक भाजपमध्ये थेट महत्त्वाच्या पदावर राहिले आहेत. राम माधव हे अलिकडचं महत्त्वाचं नाव. त्यामुळे भाजपच्या निर्णय प्रक्रियेत संघाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे वेळोवेळी दिसत आलं आहे. आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत पेच निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अखेरचा मार्ग म्हणून संघाचा धावा केल्याचं दिसत आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदासह 50-50 च्या आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. त्यामुळे मोहन भागवत ही कोंडी फोडण्यात यशस्वी होणार का, (RSS to mediate in Shivsena BJP) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.