‘थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे पाटलांची कमळा’ आला आणि पडला : सामना

| Updated on: Jun 22, 2020 | 7:45 AM

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे" असा टोलाही 'सामना'तून लगावला आहे.

थोरातांची कमळा चित्रपट गाजला, आता विखे पाटलांची कमळा आला आणि पडला : सामना
Follow us on

मुंबई : फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समाचार घेण्यात आला आहे. (Saamana Editorial on Radhakrishna Vikhe Patil Criticism on Balasaheb Thorat)

‘विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहोत याचे प्रयोग विखे स्वतः अधूनमधून करत असतात. विखे महाशयांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असे महान भाष्य केले, की “एवढे वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत”. यावर शांत बसतील ते थोरात कसले. थोरातांनीही सांगितले की “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे” असा टोला ‘सामना’तून लगावला आहे.

हेही वाचा : मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद, गांधी-नेहरु सोडून ते ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवतात : राधाकृष्ण विखे पाटील

“वरचेवर पक्ष बदलण्याची कला विखेंना अवगत आहे आणि आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे कीम नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत आणि निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत” अशी बोचरी टीकाही ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

थोरातांवर विखेंची टीका

“मी काँग्रेस पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना पद मिळालं. या बाळासाहेब थोरातांचं स्वतःचं कर्तृत्व काय? गांधी-नेहरुंचे विचार सोडून ते मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता, तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे.” अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.