देवेंद्र फडणवीसांचा शाप फळणार नाही, ‘सामना’तून निशाणा

| Updated on: Nov 28, 2019 | 8:58 AM

राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत 'सामना'तून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा शाप फळणार नाही, सामनातून निशाणा
Follow us on

मुंबई : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार हे तीन पायांचे आहे आणि ते टिकणार नाही’ असा शाप देवेंद्र फडणवीस यांनी शुभमुहूर्तावरच दिला आहे. पण हा त्यांचा भ्रम आहे. हे सरकार राष्ट्रीय प्रश्नांवर नाही, तर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर स्थापन झालं आहे आणि राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत ‘सामना’तून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा (Saamana on Devendra Fadnavis) साधण्यात आला आहे.

‘उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्र धर्माचे सरकार सत्तेत येत आहे. त्यामुळे आता राज्यात महाराष्ट्र धर्माचं पालन होईल. उद्धव ठाकरेंचं सरकार कसं येतं ते पाहूयात म्हणणाऱ्यांनीही एकदा महाराष्ट्र धर्माचं मर्म तपासून घ्यावं, असं म्हणत ‘सामना’तून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले आहेत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारल्याच्या आरोपांनाही ‘सामना’तून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं.

‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. आता कार्यकारी संपादक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सामना’चे संपादक असतील. ‘सामना’च्या अग्रलेखातून सेनेची भूमिका मांडण्याची जबाबदारी आतापर्यंत राऊतांकडेच होती.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी ‘हे’ पद सोडलं!

‘उद्धव ठाकरे यांचे वैशिष्ट्य असे की, बाहेर वादळ असले की ते शांत राहतात व शांतता झाली की वादळ निर्माण करतात. देशातील भलेभले पुढारी दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकत आहेत असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी कोणताही दबाव जुमानला नाही. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या तडजोडी केल्या नाहीत व ज्यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने ‘खोटे’ बोलण्याचा प्रयत्न केला. त्या ढोंगाशी हातमिळवणी केली नाही.’ असंही सामनाच्या अग्रलेखातून भाजपला सुनावण्यात आलं आहे.

‘मुख्य म्हणजे सरकारी बंगले, सरकारी कार्यालये व तपास यंत्रणांचा वापर कपट-कारस्थानांसाठी होणार नाही हे पक्के. त्यामुळे स्वच्छ-निर्मळ मनाने कारभार चालेल. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी खंदा मार्गदर्शक पाठीशी आहे. तीनही बाजूला प्रशासनाची चांगलीच जाण असलेल्या माणसांची फौज आहे. मुख्य म्हणजे कुणाच्याही मनात एकमेकांविषयी जळमटे नाहीत. सरकारने सरकारचे काम करावे आणि मागच्या चारेक दिवसांत काय घडले त्या चिखलात दगड न मारता विरोधी पक्षाने विधायक भूमिका बजावावी. लोकशाहीचे संकेत हेच आहेत.’ असंही अग्रलेखात (Saamana on Devendra Fadnavis) म्हटलं आहे.