शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा, या तेजानेच संकटांचा अंधार दूर होईल, ‘सामना’तून चिमटे

| Updated on: Oct 22, 2020 | 7:40 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात उपरोधिक टीका करण्यात आली आहे (Saamna editorial on PM Modi speech).

शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा, या तेजानेच संकटांचा अंधार दूर होईल, सामनातून चिमटे
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (20 ऑक्टोबर) देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाचं संकट अद्याप गेलं नसून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्यांच्या 8 ते 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी फक्त कोरोनावरच भाष्य केलं. त्यांच्या या भाषणावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात उपरोधिक टीका करण्यात आली आहे (Saamna editorial on PM Modi speech).

“पंतप्रधान मोदींनी देशांतर्गत खऱ्या संकटाची जाणीव करुन दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल”, असा चिमटा अग्रलेखात काढण्यात आला (Saamna editorial on PM Modi speech).

“मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र आणि छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरु केलेली दिसते”, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

“पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते”, अशी उपरोधिक टीका ‘सामना’ अग्रलेखात करण्यात आली आहे.

“पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले”, असंदेखील अग्रलेखात म्हटले आहे.

“मोदी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या तर कित्येक जण आस लावून टीव्हीसमोर बसले होते. पण यापैकी काहीच घडले नाही. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही आणि कुणास तूपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके आणि आटोपशीर संबोधन केले”, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला.

“मोदींनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात निष्काळजीपणा नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला. मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते”, असादेखील टोला अग्रलेखातून लगावण्यात आला.

“बाजारात हळूहळू उलाढाल वाढत आहे. आर्थिक उलाढालीत तेजी येत असल्याची माहिती मोदींनी दिली. ही गती जास्त कशी वाढेल? कोरोनामुळे जो बेरोजगारीचा भस्मासुर उसळला आहे त्यास कसा अटकाव करणार? यावर पंतप्रधान भूमिका मांडतील, असे वाटले होते. पण मोदींनी चकवा दिला”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“पंतप्रधानांनी संध्याकाळी सहाच्या भाषणात चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर बोलावे, आमच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना उचलून कधी बाहेर फेकणार ते सांगावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. पण त्यापैकी एकाही विषयाला मोदी यांनी स्पर्श केला नाही”, असंदेखील अग्रलेखात म्हटलं आहे.

“पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा आणि गुरुनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे”, असा टोलादेखील अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

संबंधित बातमी :

लॉकडाऊन गेला, कोरोना नाही, विनामास्क फिरुन कुटुंबाला संकटात टाकू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी