Sadabhau Khot : ‘आता नाही का महाराष्ट्राचा अपमान तुम्हाला झोंबला?’ ‘राज्यसभे’वरून सदाभाऊ खोतांचा संजय राऊतांना खोचक सवाल

| Updated on: Jun 12, 2022 | 12:55 PM

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम झाली. आता विधान परिषदेचा आखाडा रंगणार आहे. त्यात भाजपाने आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. तर काल सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आज मात्र सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

Sadabhau Khot : आता नाही का महाराष्ट्राचा अपमान तुम्हाला झोंबला? राज्यसभेवरून सदाभाऊ खोतांचा संजय राऊतांना खोचक सवाल
सदाभाऊ खोत (संपादित छायाचित्र)
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha election) महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर भाजपाकडून टीका होत आहे. त्यातच सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशचा बाबू 44 मते घेऊन गेला अन वाघाचे कातडे पांघरलेला (@rautsanjay61) संजय बाबू 41 मतावरच थांबला. मग आता नाही का महाराष्ट्राचा अपमान तुम्हाला झोंबला? असे ट्विट करत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना 41 मते मिळाली. तर काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांनी 44 मते मिळाली. यावरून त्यांनी राऊतांना लक्ष्य केले. राज्याबाहेरील असूनही त्यांनी अधिक मते मिळवली. आता महाराष्ट्राचा अपमान झाला, तो झोंबला नाही का, असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.

विधान परिषदेतून माघार?

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम झाली. आता विधान परिषदेचा आखाडा रंगणार आहे. त्यात भाजपाने आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. तर काल सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आज मात्र सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. तर आज सदाभाऊ खोत यांनी हा अर्ज मागे घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपाकडून विधान परिषदेसाठी पाच नावे जाहीर करण्यात आली आहेत. उमा खापरे यांचा अर्ज भरण्यात आला आहे.

मतांचे गणित जुळत नाही?

उद्या अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मात्र पाचव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्याला भाजपाने पाठिंबाही दिला होता. मात्र पाचव्या जागेसाठी उमा खापरेंचा अर्ज कायम राहिला, तर सदाभाऊ खोत आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. कारण पाचव्या जागेसाठी मतांचे गणित जुळत नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी सदाभाऊ खोत यांना अपेक्षा होती. मात्र पाचव्या जागेसाठी भाजपाकडून उमा खापरेंचे नाव घोषित झाले. खापरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. खापरेंना उमेदवारी कायम ठेवली आणि खोतांनी उमेदवारी भरली तर वेगळे गणित पाहायला मिळेल. त्यामुळे सदाभाऊ खोत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.