हा कडकनाथ कोंबडा सारखा पहाटे आरोळी ठोकतो, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींवर निशाणा

| Updated on: Nov 17, 2020 | 1:31 PM

घटकपक्ष म्हणून आम्ही भाजपसोबतच आहोत, समाधानी आहोत, एकत्र राहून सरकारविरोधात काम करणार" असं सदाभाऊ खोतांनी स्पष्ट केलं.

हा कडकनाथ कोंबडा सारखा पहाटे आरोळी ठोकतो, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींवर निशाणा
Follow us on

मुंबई : “हा सदाभाऊ खोत जिवंत असेपर्यंत तुमच्या संघटनेत परत येणार नाही” अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना सुनावलं. गेल्या काही दिवसांपासून शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. ‘कडकनाथ कोंबडा सातत्याने पहाटे आरोळी ठोकतो’ असं म्हणत खोतांनी शेट्टींवर निशाणा साधला. (Sadabhau Khot hits back at Raju Shetti over Kadaknath issue)

“भाजपवर माझा राग कधीच नव्हता. संघटना वाढवण्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपने मदतच केली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोट ठेवून आम्ही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार उभा केला होता. केंद्राचे कृषी कायदे डोळ्यासमोर होते. परंतु आता आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. घटकपक्ष म्हणून आम्ही भाजपसोबतच आहोत, समाधानी आहोत, एकत्र राहून सरकारविरोधात काम करणार” असं खोतांनी स्पष्ट केलं.

राजू शेट्टींशी दिलजमाई नाहीच

“एफआरपी अधिक दोनशे रुपये एकरकमी द्यावेत, ही ऊसासंदर्भात तुमची आणि राजू शेट्टी यांची एकच मागणी आहे, तर तुम्ही एकत्र लढा देणार का, असा प्रश्न मला विचारण्यात आला. तेव्हा मी सांगितलं की ते प्रस्थापितांच्या बाजूने आहेत, लुटारुंच्या बाजूने आहेत. त्यांनी बाजू सोडावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावं, पण त्यांना आमचं सहकार्य नको असेल, तर ठीक आहे. पाठिंबा घ्यावाच, असा आमचा काही जोर नाही. परंतु आम्ही पुढे केलेला मदतीचा हात त्यांनी झटकला, असं निर्माण केलेलं वातावरण अयोग्य आहे. आम्ही मजबूत आहोत. सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांतीतील वाघाचे बछडे लांडग्यांच्या वळचणीला जाणार नाहीत” असा निशाणाही खोतांनी साधला.

“सदाभाऊ खोतांना काढून टाकलं असं सागून राजू शेट्टी स्वतःचं महत्त्व वाढवून घेत आहेत. पण ज्यांनी मला काढलं, ते सुद्धा तुमच्या सोबत नाहीत. हा सदाभाऊ खोत जोपर्यंत जिवंत आहे, तुमच्या संघटनेत परत येत नसतो, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. ज्या बारामतीला तुम्ही आमदारकीचा तुकडा मागायला गेलात, त्याच बारामतीच्या आदेशाने राज्यातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. आता निर्वासितांप्रमाणे राज्यपालांच्या झोळीतील आमदारकी टाकली, त्यांच्यासमोर (राजू शेट्टी) आम्ही काय हात पसरणार, आमचे हात मजबूत आहेत. माझ्या झोपडीत महाल आहे, तिथे आम्ही समाधानी आहोत. तुम्ही ज्या महालात गेलात तिथे याचक झालात” असा बोचरा वारही सदाभाऊ खोत यांनी केला. (Sadabhau Khot hits back at Raju Shetti over Kadaknath issue)

“कडकनाथ कोंबडा सातत्याने आरोळी ठोकतो”

“माझी ई़डी चौकशी व्हावी, या मागणीसाठी शेट्टी वाजतगाजत गेले, पण काही हाती लागलं नाही. दुसऱ्यांचे घोटाळे माझ्या नावावर खपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आपण मात्र स्वच्छ, पवित्र, गोमूत्र शिंपडल्यासारखे आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होता. पण कागदपत्र असतील तर भर चौकात या, हे आम्ही नेहमीच सांगतो. कडकनाथ कोंबड्यांचा हा कडकनाथ कोंबडा सातत्याने पहाटे आरोळी ठोकतो. कारण खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची नीतीमत्ता आहे. परंतु हातकणंगलेतील मतदारांनी ते ओळखून एक लाख मतांनी त्यांचा पराभव केला. हा वैफल्यग्रस्त माणूस फक्त आरोप करतो. मलाही खोटे आरोप करता आले असते, परंतु पाठीत खंजीर खुपसणारा मी नाही” असं सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना सुनावलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

‘शेतकऱ्यांच्या पोरांवर ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्यासमोर यांनी लोटांगण घातलं’, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर पलटवार

पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही; राजू शेट्टींचा खोत यांच्याशी हातमिळवणीस नकार

(Sadabhau Khot hits back at Raju Shetti over Kadaknath issue)