ठाकरे सरकार ‘कोरोना’च्या तिरडीवर झोपलेले, मंत्री क्वारंटाईन : सदाभाऊ खोत

| Updated on: Jul 17, 2020 | 8:59 AM

लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपुढे शेतकरी हतबल झाला असून सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर दिसत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

ठाकरे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेले, मंत्री क्वारंटाईन : सदाभाऊ खोत
Follow us on

पंढरपूर : “ठाकरे सरकार ‘कोरोना’च्या तिरडीवर झोपलेले आहे, तर मंत्रिमंडळातील त्यांचे मंत्री हे क्वारंटाईन झाले आहेत”, अशी बोचरी टीका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. एक ऑगस्टला ठाकरे सरकारविरोधात राज्यव्यापी दूधदर आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Sadabhau Khot Slams Thackeray Government over Corona Lockdown)

“कोरोना संसर्ग निवारणाच्या कामात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या तिरडीवर झोपलेले हे सरकार आहे. आणि मंत्रिमंडळातील त्यांचे मंत्री हे क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे” अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपुढे शेतकरी हतबल झाला असून सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर दिसत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

दूधदर आंदोलन छेडण्याचा इशारा

“गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा दर कमी मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारच असेल, तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल” असा इशाराही खोत यांनी दिला.

हेही वाचा : मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला : सदाभाऊ खोत

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरकारने प्रशासक नियुक्तीचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. सरकारने राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप खोत यांनी केला. गावातील योग्य व्यक्तीची निवड करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी कोणते थर्मामीटर लावले आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

याआधी, “निवडणुकीत मतदानासाठी कामगारांना गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. मग अशा आपत्तीच्या काळात या मजुरांना त्यांच्या गावात विरोध का करता?” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला होता.