ऑपरेशन कमळ हा आमदार खरेदी विक्रीचा उद्योग!; कुणी डागलं टीकास्त्र?

| Updated on: Jun 25, 2023 | 4:16 PM

Karnataka CM Siddaramaiah on BJP : ऑपरेशन कमळवरून 'या' नेत्याचं भाजपवर टीकास्त्र; खोक्यांचा उल्लेख करत म्हणाले...

ऑपरेशन कमळ हा आमदार खरेदी विक्रीचा उद्योग!; कुणी डागलं टीकास्त्र?
Follow us on

सांगली : सांगलीत कॉंग्रेस पक्षाचा महानिर्धार मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची उपस्थिती आहे. यावेळी सिद्धरामय्या यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात येत आहे. या मेळाव्यात बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजपला जोरदार टीका केली आहे. ऑपरेशन कमळ हे आमदार खरेदी विक्रीचे उद्योग आहे. कोट्यवधी खोके देऊन आमदार खरेदी करण्याचं काम भाजप करत आहे, असं ते म्हणालेत.

महाराष्ट्रातील शिदे-फडणवीस सरकारदेखील भ्रष्ट आहे. शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रातुन कोणत्याही परिस्थितीत नेस्तनाबूत करून उखडून टाकल पाहिजे. देशात असो किंवा राज्यातील भाजप सरकार, त्यांचं विकासाचं धोरण नाही,फक्त एक उद्योग आहे. तो म्हणजे लाच घेणं आणि लाच देणं हाच उद्योग आहे, असं सिद्धरामय्या म्हणालेत.

मुळासकट भाजपला फेकून देण्याची गरज आहे. ती जबाबदारी सर्वांची आहे. कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिलं आहे. कर्नाटक राज्यात भाजप कधीही जनतेच्या आशीर्वाद घेऊन निवडून आली नाही. केवळ ऑपरेशन कमळ आणि आमदार खरेदी ते करून सत्तेवर आले, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्येच जी आश्वसनं दिली ती पूर्ण करायला सुरुवात केली. बोले तैसा चाले हे सिद्धरामय्या यांचं सरकार आहे. पण महाराष्ट्रातील शिंदे आणि फडणवीस सरकार हे भ्रष्ट आहे, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

जातीयवादी पक्ष असलेला भाजप आज घटना बदल करू पाहत आहे. सावरकरांनीसुद्धा घटनेला विरोध दर्शवला होता. आजही काही लोक घटनेला विरोध करत आहेत. पण आम्ही घटना बदलून देणार नाही याची शपथ घेतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सांगलीत येणार म्हटल्यावर सांगलीत ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी कन्नड भाषेत पोस्टर झळकावत अनेक मागण्या केल्या आहेत.

कर्नाटकातून सीमा भागात तुबची बबलेश्वर योजनेचं पाणी मिळावं अशी सिद्धरामय्या यांना विनंती करणारे पोस्टर सीमा भागातील लोकांनी लावले आहेत. तसंच कर्नाटकात पावसाळ्यात महाराष्ट्रमधून तुम्हाला पाणी दिलं जातं. तुम्ही उन्हाळ्यात जत तालुक्यातील सीमावर्ती भागाला पाणी द्यावं, अशीही मागणी या पोस्टर्समधून करण्यात आली आहे.