मुख्यमंत्री शिवसेनेचाच, शपथविधी शिवतीर्थावर : संजय राऊत

| Updated on: Nov 03, 2019 | 10:55 AM

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. 

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, शपथविधी शिवतीर्थावर : संजय राऊत
Follow us on

मुंबई : महायुतीमध्ये सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो मी नव्हेच’ ही लखोबा लोखंडेंची भूमिका घेतली आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) शपथविधी संपन्न होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Shivsena CM) व्यक्त केला.

भाजपसोबतच्या चर्चेत शिवसेनेकडून कोणतीही अडचण नाही. मात्र खोटं बोलणारी, टोपी फिरवणारी मंडळीच चर्चेतला प्रमुख
अडथळा आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे पोहचले आहेत. सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

सामनातून संजय राऊतांनी सुचवलेले सत्तास्थापनेचे पाच पर्याय

मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा शब्द शिवसेनेला भाजपने कधीच दिला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी
केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरु असलेली बोलणी फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

भाजपने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला असून भाजपचं राजकारण हे गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा करण्यात आला, यासंबंधीची माहिती आपल्याकडे आली असून याचा आपण लवकरच पर्दाफाश करणार आहोत, असंही राऊत म्हणाले. कर्नाटकात झालेलं ‘ऑपरेशन कमळ’ महाराष्ट्रात चालणार नसल्याचा इशाराही राऊत यांनी दिला.

शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. ते राज्याच्या राजकारणात येतील असं वाटत नाही, असं म्हणत पवार मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतील का, या प्रश्नाला संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Shivsena CM) बगल दिली.

याआधी, भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यास दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करु शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा 170 पर्यंत जाईल, असं म्हणत शिवसेनेचं सरकार येण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केली होती.