राष्ट्रपती राजवट लागू करायला काय तो चिवडा आहे का? : संजय राऊत

| Updated on: Nov 03, 2019 | 6:49 PM

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut on President rule in Maharashtra) यांनी केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करायला काय तो चिवडा आहे का? : संजय राऊत
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut on President rule in Maharashtra) यांनी केला आहे. तसेच राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, असंही राऊत (Sanjay Raut on President rule in Maharashtra) यांनी नमूद केलं. संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठी’च्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’मध्ये अनेक खुलासे केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, “कुणी बाजारातून आणावा आणि वाटवा याप्रमाणे राष्ट्रपती शासन म्हणजे काय गल्लीतील चिवडा आहे का? देशात राष्ट्रपती ही काही बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही. जर पहिल्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही, तर दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं लागेल. राज्यपाल राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चाही करु शकतात. त्यांच्याशी बोलून इतर पर्यायांची चाचपणी करु शकतात.”

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी भाजप-शिवसेनेने राज्यपालांकडं दावा सादर करायला हवा होता. मात्र, तसं झालं नाही. आम्ही एकत्र बसून जायला हवं अशी तयारी करत होतो. मात्र, तसं झालं नाही त्याला शिवसेना जबाबदार नाही. भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. तो सर्वात मोठा पक्ष होता. दोघांनी दावा करायला हवा होता. मात्र, युती करताना काही गोष्टी ठरल्या होत्या. अडीच-अडीच वर्ष महत्त्वाच्या पदांची वाटप झाली होती. तसं ठरल्याप्रमाणे सत्तावाटप करायला हवं. आम्ही ठरल्यापेक्षा काहीही अधिक मागत नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

‘राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी बोलावण्याचं आवाहन करणार’

संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. आम्ही लवकरच राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना सत्तास्थापनेसाठी पक्षांना बोलावण्याची मागणी करणार आहोत. त्यांनी आधी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं आणि त्यानंतर इतर पक्षांनाही संधी द्यावी, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

भाजपने विधानसभा निवडणुकीत बंडखोरांना ताकद दिल्याने आमच्या 20-22 जागा पडल्या. या बंडखोरीत दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. स्वतंत्र लढलो असतो तर फायदा झाला असता, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

मी बोलतो ते माझं व्यक्तिगत मत नाही, तर शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच सुधीर मुनगंटीवारांना भाजपनं सत्तास्थापनेवर बोलण्याचा अधिकार दिला आहे का? असेल तरच बोलावं, असा सल्लाही त्यांनी मुनगंटीवार यांना दिला.