‘महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत’, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

| Updated on: Nov 23, 2021 | 1:46 PM

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार आणि राऊत यांच्यात तब्बल 2 तास बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एसटी संपावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न सध्या सुरु असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी यावेळी केलाय.

महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप आणि अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार आणि राऊत यांच्यात तब्बल 2 तास बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एसटी संपावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न सध्या सुरु असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी यावेळी केलाय. (Sanjay Raut criticizes BJP over ST workers’ strike and Amravati violence )

‘महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतंय आणि का भडकवतंय त्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण, का करतंय यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. जे जे त्यांच्यासाठी करता येणं शक्य आहे ते सरकार करत आहे. कालच शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांनी चर्चाही केली आहे. मला आजच्या पवारसाहेबांसोबतच्या बैठकीतून असं समजलं की त्यांनी काही सकारात्मक सूचना दिलेल्या आहेत’, अशी माहिती राऊत यांनी दिली.

‘चंद्रकांत पाटलांनी झोपेतून जागे व्हावं’

त्याचबरोबर नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता, राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असं विधान केलं आहे की हे सरकार जाईल. त्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहूद्या. चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या अशा बोलण्याचं काही हे सरकार जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पॉवर सेंटर जिथे आहे तिथे मी आता उभा असल्याचं राऊतांनी सांगितलं. पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखं म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेन, असा टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.

सरकार नागपूरला अधिवेशन घ्यायला घाबरले – चंद्रकांत पाटील

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव, नांदेड आणि अमरावती पेटवण्यात आली. त्यावरून अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता अमरावती दंगलीची राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोल केला. सरकार घाबरले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेत आहे. राज्य सरकार संभ्रमाचे सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार नव्हे तर हे संभ्रम सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

इतर बातम्या :

‘नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात

तुम्हाला इम्पिरिकल डेटाची व्याख्या तरी माहीत आहे काय?; पंकजा मुंडेंनी सांगितला अर्थ

Sanjay Raut criticizes BJP over ST workers’ strike and Amravati violence