
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एका पाठोपाठ एक विधानं येत आहेत. त्यावरून राजकारण तापलंय. यावर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “वारंवार छत्रपतींचा अपमान केला जात आहे. भाजपचे (BJP) नेते सातत्याने शिवरायांवर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करत आहेत. शिवरायांचा अपमान करण्यात भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. हे सगळं वेळीच थांबलं पाहिजे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
खोके सरकार आणि राज्यपाल ह्यांच्यात कोण शिवाजी महाराजांचा अपमान करेल, यासाठी स्पर्धा सुरू आहे. कोन बनेगा करोडपतीप्रमाणे दिल्लीने सांगितलंय म्हणून हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान केला आहे, असं राऊत म्हणालेत.
“राज्यपालांना हटवण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करू”, असंही संजय राऊत म्हणालेत.
राज्यातील पर्यटन मंत्र्याला तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे. ते शिवाजी महाराजांची तुलना बेईमान व्यक्तीसोबत करतायेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीत जा. ठराव मंजूर करा हे मुग गिळून महाराजांचा अपमान सहन करताय. पण आम्ही हे सहन करणार नाही. शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
40 खोके आमदार जरी शिवसेनेतून बाहेर गेले आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी गद्दारी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली आहे. पण असं जरी असेल तरी जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या पाठिंब्याने यांना उत्तर देऊ, असं राऊत म्हणालेत.