छोटं असलं तरी राज ठाकरे ‘राज्याचे राजे’ : संजय राऊत

| Updated on: Jan 15, 2020 | 3:20 PM

भाजपला राज ठाकरेंना घेऊन राजकारण करायचं असेल, तर उत्तर भारतात मतांबद्दल फिरावं लागेल, असा सल्ला संजय राऊतांनी भाजपला दिला.

छोटं असलं तरी राज ठाकरे राज्याचे राजे : संजय राऊत
Follow us on

मुंबई : राज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत. तुमचं राज्य खालसा करा, असं आम्ही कसं म्हणणार? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या प्रश्नावर राऊतांनी टोलेबाजी (Sanjay Raut on Raj Thackeray) केली. ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्या’त संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

भाजपला राज ठाकरेंना घेऊन राजकारण करायचं असेल, तर उत्तर भारतात मतांबद्दल फिरावं लागेल. आपल्याला जे झेपेल ते त्यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी स्वतःचा मार्ग निवडला आहे, त्यांनी त्या मार्गाने पुढे जावं. आम्ही कसं म्हणणार तुमचं राज्य खालसा करा? राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे आजही आपले मित्र आहेत. त्यांनी पक्ष स्थापन केला आहे. त्यांचं ते बघतील. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आमचं सरकार आहे. मी त्यावेळी त्यांना सांगायला गेलो होतो, असा वेगळा विचार करु नका, पण त्यावेळी गाडी जाळली गेली. राज ठाकरे यांना त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा पक्ष थांबला, असंही राऊत (Sanjay Raut on Raj Thackeray) म्हणाले.

अजित पवार स्टेपनी, आमची गाडी घसरणार नाही : संजय राऊत

आम्हाला राज्य चालवण्याचा उत्तम अनुभव आहे. पुढल्या पाच वर्षात काय करायचं हे आमचं ठरलं आहे. शरद पवार यांनी आदर्श सरकार चालवायचं ठरवलं होतं. प्रत्येकाच्या इच्छेतून हे सरकार निर्माण झालं आहे. पडद्यामागच्या गोष्टी पडद्यामागे राहू द्या, असंही संजय राऊत म्हणाले. कोणतंही खातं कमी जास्त महत्वाचं नसतं, सर्व खाती महत्वाची असतात, आम्ही खाणारी खाती आमच्याकडे घेतलीच नाहीत, अशी कोपरखळीही राऊतांनी दिली.

आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती, सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येऊ शकत नाही. अजित पवारांना घेऊन गेले त्यावेळी मला काहीच वाटलं नाही, मी निर्ढावलेला माणूस आहे. अजित पवारांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केलं, असं राऊत म्हणाले.