मोदी फारच सरळमार्गी नेते, ते आता काँग्रेसच्या मार्गावर चाललेत: संजय राऊत

| Updated on: Mar 01, 2021 | 10:28 AM

मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. | Sanjay Raut

मोदी फारच सरळमार्गी नेते, ते आता काँग्रेसच्या मार्गावर चाललेत: संजय राऊत
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फारच सरळमार्गी नेते आहेत. सध्या त्यांची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर सुरु असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात लस टोचून घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि काही ‘योगायोगांमुळे’ त्यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.  (Shivsena leader Sanjay Raut take a dig at PM Narendra Modi)

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना तिरकसपणे भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीकडे राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहायला हवे, अशी टिप्पणी त्यांनी केली. राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या अवतीभोवती असतील याची काळजी घेत. निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेलही. ते फार सळमार्गी नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

नेमकं काय आहे प्रकरण?

एखादी गोष्ट लोकांच्या मनावर बिंवण्यात किंवा एखाद्या प्रतिकाचा वापर करुन ती गोष्ट व्यापक स्तरावर नेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्याच्या घडीला कोणीच धरु शकत नाही. एम्स रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि ‘योगायोगाने’ घडलेल्या काही गोष्टी सध्या चर्चेचा विषय आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमचा घातला होता. हा गमचा म्हणजे आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचण्यात आली त्यांचीही बरीच चर्चा सुरु आहे. यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. या नर्सेसनी मोदींना लस टोचून काहीवेळ त्यांच्यावर देखरेख ठेवली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये आसाम, पुदुचेरी आणि केरळचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव आणि इतर ‘योगायोग’ प्रतिकात्मक राजकारणाचा भाग असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारुन चालणार नाही.

संजय राऊतांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस टोचून घेतल्यामुळे आता जनतेत विश्वास निर्माण होईल. या लसीमुळे आपले रक्षण होईल, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. पंतप्रधानांची ही कृती कौतुकास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

आसामचा गमचा, पुद्दुचेरी-केरळच्या नर्स, चेहऱ्यावर स्माईल, मोदी आहेत तर चर्चा होणारच!

देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?

(Shivsena leader Sanjay Raut take a dig at PM Narendra Modi)