राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत स्पष्टच म्हणाले, सर्वांनी किल्मिषं दूर करून…

आम्ही राजकारण कॅलक्युलेशन करून करत नाही. हिशोब मांडत नाही. त्यामुळे 50 वर्षापासून शिवसेना राजकारणात टिकून आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी बोलत होते.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत स्पष्टच म्हणाले, सर्वांनी किल्मिषं दूर करून...
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 08, 2023 | 10:33 AM

पंढरपूर : मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या दोन्ही नेत्यांची युती होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव गेल्याचंही सांगण्यात येत आहे. ही चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे आणि आमचे संबंध चांगले आहेत. आमच्या मनात आलं तर आम्ही त्यांना थेट फोन करू शकतो, त्यासाठी मध्यस्थाची गरज नाही, असं सांगतानाच ज्यांना देश आणि राज्याच्या भल्यासाठी एकत्र यावं वाटत असेल त्यांनी सर्व किल्मिषं दूर करून एकत्र आलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे का? असा विचारलं असता त्यांनी हे मोठं विधान केलं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न वारंवार विचारला जातो. गेली 22 वर्ष विचारला जात आहे. ज्या प्रकारची हुकूमशाही, दडपशाही सुरू आहे. पैशाचं राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल तर या प्रवृत्ती विरुद्ध ज्यांची मनापासून आणि प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे, त्या सर्व घटकांनी एकत्र यावं या मताचा मी आहे. अनेक दगडांवर पाय ठेवून आता कुणालाही महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना झुकली नाही

शिवसेनेने एक भूमिका घेतली आहे. शिवसेना झुकली नाही, वाकली नाही. जे डरपोक होते. ते पळून गेले. जे स्वार्थी होते ते पळून गेले. जे राहिलेत कडवट निष्ठावंत त्यांच्या जोरावर शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीत आपला झेंडा रोवेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दोन पावलं मागे घेण्याची गरज नाही

या वयातही शरद पवार यांचा संघर्ष सुरू आहे. आम्ही त्यांच्या संघर्षात त्यांच्याबरोबर आहे. एका बाजूला राहुल गांधींचा संघर्ष सुरू आहे. आम्ही सर्व संघर्षात एकत्र आहोत. देश आणि राज्य वाचवायचं आहे. ज्यांची इच्छा आहे या देशावरचा डाग पुसावा, महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय मिळावा, त्या सर्वांनी किल्मिषं दूर करून एकत्र आलं पाहिजे. कुणी कुणाची दोन पावलं मागे घेण्याची गरज नाही कुठेही. आणीबाणीचा अपवाद वगळता आम्ही काही काँग्रेससोबत कधी आयुष्यभर राजकारण केल्याचं आठवत नाही. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो, असंही त्यांनी सांगितलं.

मध्यस्थीची गरज नाही

अभिजीत पानसे युती संदर्भात चर्चा करण्यासाठी योग्य व्यक्ती नाही. ही चुकीची माहिती आहे. आम्हाला जर या विषयावर राज ठाकरेंशी बोलायचं असेल तर आम्ही थेट फोन उचलून बोलू शकतो. तेवढे आमचे राज ठाकरेंशी संबंध आहेत. राज ठाकरे आमच्या कुटुंबातील आहेत. त्यांचं आणि माझं मित्रत्वाचं नातं अख्ख्या देशाला माहीत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत. घट्ट नातं आहे. त्यामुळे कुणालाही मध्ये येऊन मध्यस्थता करण्याची गरज नाही. ते दोघे भाऊ आहेत, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आमचं आयुष्य एकमेकांबरोबर गेलं. त्यामुळे मध्यस्थी करण्याची कुणाचीही गरज नाही. कुणी मध्ये आला… काही गरज नाही. एका फोनवर आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. आणि अनेकदा बोललो आहोत, असंही ते म्हणाले.

मी बोलणं योग्य नाही

मनसेने राज्यातील बदलत्या समीकरणाविरोधात सह्यांची मोहीम सुरू केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा त्यांचा पक्ष आहे. काय करावं आणि काय करू नये हे ते ठरवतील. त्या त्यांच्या भूमिका आहे. त्यांच्या मोहिमांवर मी बोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अस्वस्थता आहे

यावेळी त्यांनी शिंदे गटावरही टीका केली. शिंदे गटात अस्वस्थता आहे. 40 लोकांना फुटलो तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या हातात येईल, तिजोरीच्या चाव्या येईल, असं वाटत होतं. काही ठेकेदारांची चांदी झाली असेल. पण अजित पवार यांच्या निर्णयाने त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. आम्ही करू तेच ही ताकदही संपली आहे, असं राऊत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us