वर्धापनदिनी सेनेची डरकाळी, अंगावर याल तर ‘हर हर महादेव’ गर्जना करुन हिशेब करु, भाजपला इशारा

| Updated on: Jun 19, 2021 | 8:01 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून सध्याच्या सत्तेतल्या शिवसेनेवर आणि इथून पुढच्या सेनेच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (Sanjay Raut Saamana Editorial  Over Shivsena 55th Foundation)

वर्धापनदिनी सेनेची डरकाळी, अंगावर याल तर हर हर महादेव गर्जना करुन हिशेब करु, भाजपला इशारा
संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून सध्याच्या सत्तेतल्या शिवसेनेवर आणि इथून पुढच्या सेनेच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसंच अंगावर याल तर हिशोबही चुकता करु, असा इशाराच विरोधी पक्ष भाजपला देण्यात आलाय. (Sanjay Raut Saamana Editorial  Over Shivsena 55th Foundation)

तर हर हर महादेव म्हणत हिशेब करु, सेनेची घोडदौड सुरुच राहिल!

महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती 55 वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील!

मुख्यमंत्र्यांचं संबोधन

शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह, बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो. पण ‘कोरोना’ महामारीने या सगळ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे. संपूर्ण देशाचीच स्थिती कोरोनामुळे गंभीर, तितकीच नाजूक बनली आहे. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.

जे महाराष्ट्राला जमलं ते केंद्र सरकार, उ.प्रदेश, गुजरातला जमलं नाही

महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण कोरोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे. या लाटांनी आम्ही सगळय़ांनीच आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले. त्या सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच, असं म्हणत मुख्यमंत्र्यांची आजच्या सामना अग्रलेखातून स्तुती करण्यात आली आहे.

शिवसेना सेवा धर्माला जागते

शिवसेना या संकटकाळात आपल्या सेवाधर्माला जागते आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या मंत्राला जागत शिवसैनिकांनी खासगी रीतीने कोविड सेवा केंद्रे उभी केली. आरोग्य आणि रक्तदान शिबिरे घेतली. गोरगरीबांच्या चुली बंद पडल्या तेथे मोफत अन्नधान्य पुरवठा करून महाराष्ट्र धर्माचे नाव राखले. आजचा काळ असा आहे की, राजकारण, मतभेद चुलीत टाकून महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचीच गरज आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

शिवसेनेचं 55 वर्षाचं सार शिवसेनाप्रमुखांच्या पहिल्या भाषणात

शिवसेना स्थापन करतानाच शिवतीर्थावरील पहिल्याच विराट सभेत शिवसेनाप्रमुखांनी एक मंत्र दिला, तोच महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ”मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू!” या एकजुटीच्या वज्रमुठीतच शिवसेनेच्या 55 वर्षांचे सार सामावलेले आहे. शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे. शिवसेनेने आपले रंग सरडय़ासारखे बदलले नाहीत. कष्टकरी, शेतकरी, नोकरदारवर्गाने शिवसेनेला भरभरून पाठबळ दिले ते याच सचोटीच्या राजकारणामुळे.

(Sanjay Raut Saamana Editorial  Over Shivsena 55th Foundation)

हे ही वाचा :

Shivsena @55 | शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंचा सर्व शिवसैनिकांशी संवाद