मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत एकच, उद्धव ठाकरेंनी प्रोटोकॉल का तोडावा? : संजय राऊत

| Updated on: Sep 03, 2020 | 1:25 PM

'डिजिटल इंडिया' वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत एकच, उद्धव ठाकरेंनी प्रोटोकॉल का तोडावा? : संजय राऊत
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. (Sanjay Raut says CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi follows same protocol)

मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. काम होण्याशी मतलब आहे. ‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी टीकाकारांना दिले.

“लॉकडाऊनची भूमिका केंद्र सरकारची आहे. सरकारला काय हौस नाही हे बंद करायची. मंदिरांचे एक अर्थशास्त्र आहे. मंदिरे खुले करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भूमिका आहे. योग्य वेळी ते निर्णय घेतील. लोकांच्या जीविताशी खेळलं जावू नये, रस्त्यावर उतरुन हे संकट वाढवू नये” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

“अपघाताने निवडून आलेल्या खासदारांनी भान ठेवावे”

“अपघात म्हणून निवडून आलेल्या औरंगाबाद खासदारांनी भान ठेवणं गरजेचं आहे. विरोधकांनी संयम ठेवावा, टोकाची भूमिका घेऊ नये” असा इशारा मंदिर-मशिदी उघडण्यासाठी आंदोलन करणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपला संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्र सरकार केंद्राप्रमाणे या संकटाला ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ किंवा देवाची करणी मानत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“राज्यहितासाठी बदल्या”

“सरकार बदलल्यावर बदल्या करु नयेत, असं लिहून ठेवलंय का? त्यांच्या काळात झाल्या नव्हत्या का बदल्या? राज्यहितासाठी बदल्या केल्या आहेत” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

विरोधी पक्षनेते यांनी आर्थिक स्थितीवर अभ्यास करुन राष्ट्रीय स्तरावर प्रश्न मांडावा, असे संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. संसदेत प्रश्नोत्तराचा तास होत नाही, कारण कोरोना संकट आहे. पण अधिवेशन होणं महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. (Sanjay Raut says CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi follows same protocol)

“पांडुरंगच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार”

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने प्राण गमवावे लागलेले ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. पुण्यात अँम्ब्युलन्स मिळू नये हे दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले

सीमेवरच्या बातम्या गाळून येत आहेत. चिंता करावी असा हा सध्या प्रश्न आहे, असे मत संजय राऊत यांनी चीनसोबत सीमेवर होणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.

कंगना रनौतला टोला

ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतला लगावला. संजय राऊत यांनी मला पुन्हा मुंबईला न येण्याची खुली धमकी दिली आहे, असा आरोप कंगनाने ट्विटरवर केला होता.

संबंधित बातम्या :

मंदिरं उघडण्यात सरकारला आकस का? नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या ‘या’ दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी मानले आभार

(Sanjay Raut says CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi follows same protocol)