चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली, संजय राऊतांचा मोदी सरकारवर ‘रोखठोक’ निशाणा

| Updated on: Jun 21, 2020 | 6:04 PM

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जून रोजी रात्री मोठी झडप झाली. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली (Sanjay Raut slams PM Narendra Modi).

चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली, संजय राऊतांचा मोदी सरकारवर रोखठोक निशाणा
Follow us on

मुंबई :मोदी सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणांमुळे चीनने भारतावर आक्रमण केलं” (Sanjay Raut slams PM Narendra Modi), असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून केला. ‘चीनच्या आक्रमणाने मोदी सरकारच्या बाहुबली राजकारणाची हवा निघाली”, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे (Sanjay Raut slams PM Narendra Modi).

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जून रोजी रात्री मोठी झडप झाली. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

“हिंदुस्थानच्या सर्व सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले! परराष्ट्र आणि संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“चीनने आपले 20 सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करुन विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : India China Face Off | बिहार रेजिमेंटचे प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, आणि… 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?

“20 जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. 1962चे चीनबरोबरचे युद्ध नेहरुंच्या धोरणांमुळे हरलो, हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही”, असा टोला राऊत यांनी लगावला.

“गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले आणि आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले. सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे”, असं संजय राऊत ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरात म्हणाले.

“हिंदुस्थानच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत. चीनच्या इशाऱ्यावर हिंदुस्थानला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र आणि संरक्षणविषयक नीती असू शकत नाही”, असंदेखील संजय राऊत म्हणाले.

“पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याही बाहुबली राजकारणाची हवा लडाख, गलवान व्हॅली प्रकरणात निघाली आहे. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली. आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे. भविष्यकाळातही चीन हाच आपला मुख्य दुश्मन राहणार आहे. त्यामुळे हिमालयाचा दुर्गम आणि अति उंच परिसर हेच आपले खरेखुरे युद्धक्षेत्र आहे. गलवान व्हॅलीत आपण खाली खोल कोसळलो आहोत. त्यातून बाहेर पडावे लागेल. पंतप्रधान मोदींबरोबर देश उभाच आहे, पण ते देशाचे ऐकणार आहेत काय?”, असा प्रश्नदेखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“आज स्थिती अशी आहे की, सीमावाद पेटलेला असताना आपला चीनबरोबर व्यापार सुरु आहे. 20 जवानांना मानवंदना म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्काराची घोषणा तरी आपल्या पंतप्रधानांनी करायला हवी, पण तेही झालेले नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महिन्यापूर्वीच शंका उपस्थित केली होती की, चीनचे सैन्य लडाखमध्ये आपल्या भूभागात घुसले आहे. मोदी यांनी देशाला सत्य सांगावे. गांधी जे बोलत होते ते सत्य होते. पराभव लपविण्यासाठी गांधी यांना खोटे पाडले गेले”, असंदेखील संजय राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.