फारुख अब्दुल्लांना पाकिस्तानमध्ये जायचंय का; देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणू शकत नाही: संजय राऊत

| Updated on: Nov 07, 2020 | 11:52 AM

फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये जाऊन 370 कलम लागू करायचेय का | Sanjay Raut

फारुख अब्दुल्लांना पाकिस्तानमध्ये जायचंय का; देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणू शकत नाही: संजय राऊत
Follow us on

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याची भाषा करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारले आहे. फारुख अब्दुल्ला यांना देशातून बाहेर पडून पाकिस्तानात कलम 370 आणायचेय का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करावे, असे कोणताही राष्ट्रभक्त म्हणणार नाही. हे ज्यांना नकोय, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असेल. परिणामी कलम 370 पुन्हा लागू करु, अशी वक्तव्ये करणाऱ्यांची डीएनए टेस्ट करायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ( No one can restore article 370 in Kashmir says Sanjay Raut)

गेल्या काही दिवसांपासून फारुख अब्दुल्ला वारंवार काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याची भाषा करत आहेत. जम्मू काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असे वक्तव्य त्यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 आणू शकणार नाही. फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये जाऊन 370 कलम लागू करायचेय का, हे विचारले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

तसेच कलम 370 रद्द झाल्यामुळे देशाच्या इतर भागातील उद्योजकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्राला गती येईल. येथील लोकांना रोजगार मिळतील. काश्मीरची जनता मुख्य प्रवाहात येईल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

‘जनतेने नितीशकुमारांना सन्मानपूर्वक निरोप द्यायला पाहिजे’

नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. त्यांनी स्वत:चा डाव खेळला आहे. आमच्या मनात नितीश कुमार यांच्याविषयी आदर आहे. जनतेनेही नितीश कुमार यांच्यासारख्या नेत्याला सन्मानाने निरोप दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच बिहारमध्ये तब्बल 20 वर्षानंतर परिवर्तनाचे वारे दिसत आहे. आता केवळ तेजस्वी यादव यांच्याकडून आशा आहेत. विरोधक जंगलराज येईल, अशी टीका करतात. पण देशात सध्या अनेक ठिकाणी जंगलराज चालत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

संबंधित बातम्या:

काश्मीरमधून कलम 370 हटवून काय केलं, काय परिस्थिती बदलली? संजय राऊतांचा भाजपाला सवाल

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला

( No one can restore article 370 in Kashmir says Sanjay Raut)