पाकिस्तानात निषेधाचे होर्डिंग्ज, संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

| Updated on: Nov 28, 2019 | 1:52 PM

संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. 'वाय' प्रकारात 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्‍यांसह 11 जवानांचे सुरक्षा कवच असते

पाकिस्तानात निषेधाचे होर्डिंग्ज, संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत केलेल्या भाषणानंतर त्यांचे पाकिस्तानात पोस्टर लागले होते. या भाषणानंतर खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी बाक वाजवून राऊतांचं कौतुक केलं होतं. परंतु संजय राऊतांच्या जीवाला संभाव्य धोका (Sanjay Raut Y Security) लक्षात घेऊन त्यांच्याभोवती आता 11 जवानांचं कडं असेल.

संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. ‘वाय’ प्रकारात 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्‍यांसह 11 जवानांचे सुरक्षा कवच असते. दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचाही (पीएसओ) यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारची सुरक्षा भारतात बऱ्याच व्यक्तींना आहे.

मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला होता. “कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असं जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला. संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाकही वाजवला होता.

त्या भाषणाचे पडसाद फक्त संसदेच्या सभागृहात किंवा देशातच नाही, तर पाकिस्तानातही उमटले होते. चवताळलेल्या पाकिस्तानात संजय राऊत यांचे  होर्डिंग्ज ठिकठिकाणी लावण्यात आलं होतं. गृह विभागाच्या अहवालानुसार संजय राऊत यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे कलम 370 बाबतचा निर्णय?

मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

‘या निर्णयाला विरोध होईल पण आपण पाहिलं असेल की विरोध इथे झोपला आहे. त्यांना झोपू द्या, त्यांना आराम करु द्या. आपण काम करु. आज जम्मू-काश्मीर घेतलं, उद्या बलुचिस्तान घेऊ, त्यानंतर पाकव्याप्त कश्मीर घेऊ आणि अखंड भारताचे जे स्वप्न आहे ते या देशाचे सरकार, पंतप्रधान आणि गृहमंत्री पूर्ण करतील’ असेही संजय राऊत (Sanjay Raut Y Security) राज्यसभेत म्हणाले होते.