आम्ही काहीही केलं असेल, पण कधी तुरुंगात गेलो नाही; पवारांचं शाहांना उत्तर

| Updated on: Sep 17, 2019 | 5:09 PM

मागील मोठ्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) गळती लागली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाल्याने अखेर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत.

आम्ही काहीही केलं असेल, पण कधी तुरुंगात गेलो नाही; पवारांचं शाहांना उत्तर
Follow us on

सोलापूर : मागील मोठ्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) गळती लागली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाल्याने अखेर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज (17 सप्टेंबर) ते सोलापूरमध्ये (Solapur) आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका केली. पवारांना काय काम केलं या भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रश्नालाही शरद पवारांनी उत्तर दिलं. जे काही केलं ते बरं वाईट केलं, मात्र कधीही तुरुंगात गेलो नाही, असं म्हणत पवारांनी शाहांना टोला लगावला.

‘गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा’

सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात, असं म्हणत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही लक्ष्य केलं. शरद पवार म्हणाले, “पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजडणाऱ्यांची काळजी घेऊ, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा.”

‘यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच’

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापुरात काँग्रेस जिंकली, अशीही आठवण पवारांनी यावेळी सांगितली. तसेच इतर ठिकाणी काय झालं याची काळजी न करता, इथं सोलापूरमध्ये इतिहास घडवू. सत्ता येते जाते, त्याची काळजी नाही. मी 52 वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झाले. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असाही विश्वास पवारांनी व्यक्त केला.

पवारांनी ते सोलापूरचे पालकमंत्री असतानाच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले, बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या समोर बोलायला उभा राहिलो आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापुरातून झाली. 1965 मध्ये मी तरुणांचं नेतृत्व केलं. तेव्हा सोलापूरची जबाबदारी माझ्यावर होती. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आणि 4 हुतात्म्यांचा जिल्हा हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. सोलापूर कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. इतिहासात सुवर्ण अक्षरात नाव लिहावं असा हा जिल्हा आहे.” अशा या स्वाभिमानाचा पुरस्कार करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात काही नेत्यांनी लाचारी पत्करली. त्यांना त्यांची जागा दाखवा, असंही आवाहन पवारांनी उपस्थितांना केलं.