बार्शीकर पळपुट्या राजकारण्यांना जागा दाखवतात, शरद पवारांचा सोपलांवर निशाणा

| Updated on: Oct 15, 2019 | 12:18 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी बार्शी (Sharad Pawar in Barshi) येथील प्रचारसभेत भाजप-शिवसेना सरकारवर घणाघाती टीका केली.

बार्शीकर पळपुट्या राजकारण्यांना जागा दाखवतात, शरद पवारांचा सोपलांवर निशाणा
Follow us on

सोलापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी बार्शी येथील प्रचारसभेत (Sharad Pawar in Barshi) भाजप-शिवसेना सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप सोपल (Sharad Pawar on Dilip Sopal) यांच्यावरही निशाणा साधला. बार्शीकर पळपुटं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवतात. बार्शीकर शब्दाला पक्का आहे. तो नक्कीच त्यांना जागा दाखवेल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, “गेलेल्यांची चर्चा कशाला करायची. इतकी वर्षे आम्ही तुम्हाला उमेदवारी दिली तेव्हा तुम्ही काय केलं? तुम्ही आज विकास करायचा म्हणून पक्षांतर करत असल्याचं सांगत आहात. मात्र, बार्शीकर पळपुटं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतात. बार्शीकर शब्दाला पक्का आहे तो त्यांना त्यांची जागा दाखवून देईन.”

“जिथं भवानी तलवार चमकली, तिथं भाजप-सेनेच्या काळात छमछम पाहायला मिळणार”

ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार चमकली, तिथं भाजप-शिवसेनेच्या काळात छमछम बघायला मिळणार असल्याचं मत शरद पवारांनी (Sharad Pawar on New Fort Policy) व्यक्त केलं. त्यांनी राज्य सरकारच्या गड-किल्ल्यांच्या नव्या धोरणावर बोट ठेवत हा हल्ला केला. मागील काळात राज्य सरकारने काही गड-किल्ले लग्न आणि हॉटेलिंगसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचं धोरण जाहीर केलं होतं.

शरद पवार म्हणाले, “मागील वेळी भाजप सरकारने शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्य चालवू अशी घोषणा केली. मात्र, 5 वर्ष होऊन गेले तरी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक विटही उभी केली नाही. ते शिवाजी महाराजांच्या नावानं खोटं बोलले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावानं आश्वासन दिली, मात्र ती खोटी करुन दाखवली. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार चमकली होती, तिथं आज भाजप-शिवसेनेच्या कारकिर्दीत छमछम बघायला मिळणार आहे.”

‘समोर पैलवान नाही, मग महाराष्ट्रात फिरायला येता का?’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात निवडणुकीच्या मैदानात कुणी पैलवानच नसल्याचं म्हटलं होतं. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीचं आव्हानच नसल्याचं सुचित केलं होतं. इथं लढाईच नाही. कुस्तीला समोर नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीत खरंच कुणी पैलवान नाही असं वाटत आहे. निवडणुकीत चुरशीची लढाई नाही असं वाटत आहे. तर मग मुख्यमंत्री फडणवीस इथं महाराष्ट्र फिरायला येतात का?”